हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात रायगड पोलीस अव्वल! वर्षभरात हरवलेल्या ९४४ मोबाईल्सचा शोध लावला…

42

हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात रायगड पोलीस अव्वल! वर्षभरात हरवलेल्या ९४४ मोबाईल्सचा शोध लावला…

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
८४२०३२५९९३

अलिबाग:-रायगड पोलीस दलाने सेन्ट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टलचा वापर करत, वर्षभरात हरवलेल्या ९४४ मोबाईल फोन्सचा शोध घेण्यात यश मिळवले आहे. हरवलेल्या मोबाईलचा शोध घेऊन ते संबधितांना परत करण्यात रायगड पोलीस राज्यात अव्वल ठरले आहेत.

मोबाईल फोन चोरीच्या वाढत्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र सरकारच्या टेलिकॉम विभागाने सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर अर्थात सिईआयआर पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलचा प्रभावीपणे वापर करत रायगड पोलीस दलाने हरवलेल्या आणि चोरीला गेलेल्या मोबाईल फोन्सचा तपास सुरू केला आहे. बुधवारी रायगड पोलीस दलाच्या सायबर सेलने २४ जणांना त्यांचे हरवलेले फोन परत करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, सायबर सेलच्या प्रमुख रिझवाना नदाफ उपस्थित होत्या.

गेल्या १० महिन्यात रायगड पोलीस दलाच्या हद्दीत १ हजारहून ७१९ मोबाईल फोन हरवल्याच्या तक्रारींची नोंद झाली होती. यातील १ हजार ०४० फोन्सचा शोध घेण्यात पोलीसांना यश आले. महत्वाची बाब म्हणजे यातील ९४४ मोबाईल फोन संबधित तक्रारदारांना परत मिळवून देण्यात आले आहेत. राज्यात हरवलेले मोबाईल्स शोधून ते परत मिळवून देण्यात रायगड पोलीस राज्यात अव्वल ठरले आहेत.

तपासकामातील सातत्य हे या यशा मागिल महत्वाचे कारण ठरले आहे. मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी जिल्हा स्तरावर सहा. पोलीस निरीक्षक अमोल जाधव, सहा फौजदार अजय मोहीते, पोलीस हवालदार श्रेयस गुरव, सुचिता पाटील राजीव झिंगुर्डे यांचे पथक नियुक्ती करण्यात आली होती. याशिवाय प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली होती.

ज्यामाध्यमातून हरवलेल्या आणि चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध निरंतर सुरु होता. मोबाईलचा नंबर आण हँण्डसेटचा आयएमईआय नंबर शोध घेऊन हरवलेल्या आणि चोरीला गेलेल्या उपकरणांचा घेतला जात असतो. उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, तामिळनाडू ओरीसा या राज्यामधून सायबर सेलने हरवलेल्या मोबाईल्सचा शोध घेत हे मोबाईल फोन्स हस्तगत केले आहेत.

दरम्यान नागरिकांनी मोबाईल फोन हरवल्यास अथवा चोरीला गेल्यास तात्काळ सिईआयआर पोर्टल वर तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी केले आहे.

भारत सरकारने मोबाईल चोरी किंवा हरवण्याच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करण्यासाठी आणि गहाळ झालेले मोबाईल त्यांच्या मालकांना परत मिळवून देण्यासाठी https://www.ceir.gov.in हे ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलवर हरवलेल्या किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलची ऑनलाइन तक्रार नोंदवता येते. त्यानंतर पोलीस विभागाकडून तांत्रिक पद्धतींनी मोबाईलचा शोध घेऊन तो संबंधित धारकांना परत केला जातो. देशात या पोर्टलवर ४१ लाख ४६ हजार मोबाईल फोन हरवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ज्यातील २५ लाख ७१ हजार मोबाईल फोनचा शोध घेण्यात यश आले आहे.