संस्कृती संवर्धन की अधःपतन?

सुरक्षा शशांक घोसाळकर

पवई, २० जून: अजूनही कित्येकांना बालभारतीचे पुस्तक आठवले की बालपणीच्या आठवणीं मध्ये हरवून जायला होते. त्यातली बडबड गीते, गोष्टी बालमनावर हसत खेळत नकळतपणे संस्कार करण्याचे काम करायचे. बालपणीच्या राजपुत्र आणि राजकुमारीच्या कथां मधला बेडूक आठवतोय? जो राजकुमारीच्या पहिल्या प्रेमाच्या चुंबनाने शापित राजकुमाराला मानवी रूपात परत येणारा. मग आताच्या आधुनिक सतत बदलत्या जीवनशैली प्रमाणे आधुनिक संस्कृतीचा कोणताही प्रकार अंगीकारण्याची क्रेझ असलेल्या राजकुमारी राजकुमाराचे परिवर्तन राक्षसी प्रवृत्ती मध्ये का होत आहे? याचा गांभीर्याने विचार करून शैक्षणिक , सामाजिक व कायदेविषयक बदल होणे अत्यावश्यक आहे. सद्याच्या सोशल मिडीया, कथा, चित्रपट आणि विशेषतः मालिकांनी सगळच रोमँटीक व रोमांचक केले आहे. माहितीचा अभाव, गोष्टीचे पूर्ण ज्ञान नसताना प्रयोग म्हणून प्रेम करणे, प्रेमाची, नाते संबंधांची समज अपरिपक्व असल्याने ब्लाइंड डेट मुळे दुर्दैवी अपघात होत असलेल्या विकृत घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

रिलेशनशिप म्हणजे नाते संबंध होय. भावनिक दृष्ट्या कमकुवत असल्याने एखाद्या बद्दल आकर्षण वाटून प्रेमात पडणाऱ्यांना नाते म्हणजे काय? हे जाणून घेण्याची गरज आहे. ज्यात कौटुंबिक , सामाजिक , व्यावसायिक , प्रेमाच्या नाते संबंधांचा समावेश होत असतो. कमिटेड रिलेशनशिप म्हणजेच वचनबध्द नाते संबंध. ज्यात आपल्या जोडीदाराला जीवनभर एकमेकां सोबत राहण्याचे एकमेकांवर प्रेम करण्याचे वचन दिलेले असते. अठरा वर्षे पूर्ण झालेली कोणतीही व्यक्ती मुलगा किंवा मुलगी किंवा समलैंगिक जोडीदारा सोबत स्वतःच्या संमतीने लग्न न करता एकत्र राहण्याच्या पद्धतीला लिव्ह इन रिलेशनशिप हे गोंडस नाव दिलेले आहे. विधीमंडळ या नात्याला वैध मानते.

https://mediavartanews.com/2023/06/18/woman-empowerment-in-india/

सर्वोच्च न्यायालयाने या नात्या संदर्भात २०१३ मध्ये मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. लिव्ह इन रिलेशनशिपच्या कायदेशीर मान्यतेनुसार दोघांमाध्ये लैंगिक संबंध ठेवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. रिलेशनशिप मध्ये मुलाचा जन्म झाला तर तो वैध ठरतो. भारतीय पत्नीला घटनात्मक दृष्ट्या दिलेले सर्व कायदेशीर अधिकार लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या महिलांनाही आहेत. नाते जपताना मानसिक , वैचारिक , भावनिक , आणि सामाजिक परिणाम लक्षात ठेवून आर्थिक स्थिती सुधारणे अभिप्रेत आहे. परंतू नियम न पाळणे , नैतिक जबाबदारी न घेणे हेच निर्माण होणाऱ्या समस्यांचे मूळ आहे. तसे न केल्यास त्याचे टाॕक्सिक रिलेशनशीप म्हणजे विषारी तसेच त्रासदायी नाते संबंध जे नाते आपणास त्रास देत असेल ज्यात राहून फक्त मनस्ताप सहन करावा लागत असेल असे रूपांतर होते. त्यासाठी शालेय शिक्षणात संबंधांचे व्यवस्थापन करण्याचे, शरीर धर्माचे ज्ञान मुला मुलींना देणे महत्त्वाचे आहे. मुलीच शिक्षण प्रगतीचे लक्षण या धारणेने शिक्षणाला प्रोत्साहन दिले गेले परंतू महिलांची बिघडलेली दिशा पाहून संस्कार देण्यात कमी पडलो असे वाटते. 

जो विषय घरचे लोक हाताळू शकत नाहीत ते विषय शाळेत हाताळले गेले पाहिजेत. प्रत्येकाला गरज असते ती प्रेमाची व विश्वासाची. विद्यार्थी हा माझा पाल्य आहे असे समजून वयात येणाऱ्या मुलांना नजरेतून वात्सल्य देऊन त्यांच्या शंकांचे निरसन तसेच होणाऱ्या शारीरिक, मानसिक बदलांना वास्तवाचे भान ठेवून नियंत्रण कसे ठेवावे याचे कौशल्य ज्ञान देणे महत्वाचे आहे. याकरिता वयात आलेल्या मुलांच्या पालकांचे वर्षातून कमीतकमी ४ वेळा प्रबोधन वर्ग घेतलेच पाहिजेत. मुलांचे प्रशिक्षण जितके महत्त्वाचे आहे. त्याच्या दहापट जास्त पालकांचे प्रबोधन होणे नितांत गरजेचे आहे.कित्येक पालक आपल्या धुंदीतच जगत आहेत. स्वतः सोबत इतरांचा विचार करणाऱ्या दुसऱ्याला सहकार्य करण्याची भावना असणाऱ्या व्यक्ती दुर्मिळ झाल्या आहेत. संगणकाच्या युगात आधुनिक क्रांती झाली. मर्यादे पेक्षा जास्त पैसा मिळायला लागला. माझ्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करता येतील ऐवढे मेहनत करून पैसे कमवणा-या कुटुंबवत्सल व्यक्ती इतिहास जमा झाल्या. टेलिकम्युनिकेशन वाढले परंतू कुटूंबातील अंतर्गत कम्युनिकेशनचे काय? पैसे कमविणारी मुलमुली पैशाला सर्वस्व मानून आता मला कोणाची गरज नाही असे म्हणत कुटुंबाला नगण्य स्थान देतात. त्यामुळे कुटुंब संस्था उध्वस्त व्हायला लागली. परंतू देह धर्मासाठी उच्च शिक्षित कुटुंबा मध्ये लिव्ह इन रिलेशनशीप संस्कृती जन्माला आली.

भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. कुटुंब संस्कृती मध्ये एकमेकांची काळजी घेणे ही भारतीय परंपरा आहे. याला छेद देण्याचा प्रकार पाश्चिमात्य संस्कृतीच अंधानुकरण करणाऱ्या शिक्षितांनीच आपली संस्कृती पायदळी तुडविण्याचे काम केले. चैनीसाठी पैसा मिळविणे महत्वाचे मानले. मानवाची सवय आहे झाकून ठेवले की वाकून पहायचच. त्यामुळे शरीर सुखाची उत्सुकता वाढून पैसे हातात असल्यामुळे मजबूती मिळाली. एकमेकांची जबाबदारी टाळणे, समाज मान्यतेने एकत्र न आल्याने एकमेकांच्या वर्तनावर अंकुश न राहिल्याने वादाचे प्रसंग उदभवतात. त्याचे रूपांतर निर्घुण हत्येत झालेले पहायला मिळते. विभक्त कुटुंब पध्दती प्रमाणेच फ्लॕट संस्कृती मध्ये शेजारच्या व्यक्तींशी संपर्क नसल्यामुळे धोका वाढला आहे. माणूस हा हल्ली खूप एकलकोंडा झाला आहे. कोणाशी संवाद नाही. चांगले मित्रपरिवार नाही. माणूस समाजशील राहिला नाही. प्रेम ,बंधुता ,आपुलकी लोप पावत चालली आहे. आपल्या भारत देशाची ही संस्कृतीच नाही. माणूस हा समाजशील प्राणी आहे. हे विज्ञानाने सुद्धा सिद्ध केले आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये जगण्याच्या पद्धतीमुळे अशा सर्व गोष्टींना पेव फुटतात. जर मूल लहानपणा पासूनच आजी-आजोबांच्या अंगा खांद्यावर खेळेल, संस्कारांमध्ये वाढेल, त्याला माया मिळाली तर तो पुढे समाजाला माया देईल.

      लिव्ह इन रिलेशनशीप सारखे बहुमताने कायदे करणाऱ्यांनी या घटनांची भारतीय संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी नैतिक जबाबदारी स्विकारली पाहिजे. गुन्हेगाराला शिक्षा देण्याचा कालावधी लांबला तर त्याची तीव्रता कमी होते. गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसावर वचक बसत नाही . छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण स्त्रियांचा आदर करा. हे सर्व कुठेतरी विसरत चाललो आहोत.

https://mediavartanews.com/2023/06/19/acid-rain-information-in-marathi/

छत्रपती शिवाजी महाराजां सारखी गुन्ह्याची तीव्रता पाहून मानवी देहाला इजा करणाऱ्याला, लैंगिकतेच्या प्रवृत्तीला सजा देण्याची पध्दत अमंलात आणली पाहिजे. गुन्हेगाराला कारागृहात फुकटचे पोसून कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या यंत्रणांना वेठीस धरण्यापेक्षा कमीतकमी कालावधीत वेळप्रसंगी जाहीर शिक्षा करणे या सारखे कायद्यात बदल होणे आवश्यक आहेत. सत्ता स्थापनेसाठी रातोरात बहुमत सिध्द करण्यासाठी वेळ देणारे राजकारणी या वाढत्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस पावले उचलताना दिसत नाहीत. जिथे विवाहित स्त्रीला अपरिचित व्यक्तीने पाठविलेल्या अश्लील संदेशा करीता न्याय मागताना फाॕरेनसिक लॕबचा अहवाल मिळायला दहा वर्षे लागतात तर अन्य पिडीतांबाबत विचार न केलेला बरा. अशा या न्याय प्रक्रीयेमध्ये जो पर्यंत बदल होत नाहीत तो पर्यंत सर्वांनी एकत्रितपणे सांविधानिक मार्गाने उठाव करायलाच हवा. नाहीतर हा वणवा आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही.

भारतीय दंड संहिता अंतर्गत महिलांसाठी सुरक्षितता आणि आरोपीला जबरदस्त शिक्षा दिली गेली पाहिजे. विषयाचे गांभीर्य लक्षात घेता आपले कायदे आरोपींना शिक्षा करायला योग्य वाटत नाहीत. शंकाकुशंका काढून शिक्षेला पळवाटा शोधून तो मी नव्हेच असे घडते. गंभीर गुन्हे करून जामिनावर सुटून सुद्धा पुन्हा आपली दहशत माजवतात व पुन्हा अतिशय गंभीर गुन्हे करतात अशा गुन्हेगारांना आपल्या कायद्याची भीती राहिलेली नाही. त्यामुळे संविधानाच्या पार्श्वभूमीवर विद्यमान कायदे आहेत त्यात आता सुधारणा करणे अत्यावश्यक झाले आहे. गुन्हेगारांना विद्यमान कायद्यांची भीती वाटत नाही हे सिध्द झालेले आहे.

       लहान बालक, कन्या, महिला, वृद्ध यांची हत्या करणार्‍या आरोपींना भर चौकात फाशी दिली पाहिजे. हे आता कायदे मंडळाने मान्य करावयास हवे. विविध टीव्ही मालिका, चित्रपट यामधून गुन्हेगारीला प्रवृत्त करणार्‍या घटना प्रदर्शित करण्यास सेन्साॕर बोर्डाने लाचखोरीने मान्यता देता नये. गुन्हेगारीचे हे आधुनिक प्रकार याच माध्यमातून जनते पर्यंत पोहोचतात. अशा विकृतींसाठी जबाबदारीचे भान नसलेली प्रसार माध्यमे, टीव्ही न्यूज चॕनल, सोशल मीडिया आणि पाहणारे ही तेवढेच जबाबदार आहेत.त्यामुळे सरकारने याप्रकरणी कडक पाऊले तात्काळ उचलली पाहिजेत. मग ते सरकार कोणत्याही राजकिय पक्षाचे असो.लिव्ह इन रिलेशनशीप या घटनेकडे पाहता महिलांसाठी सुरक्षितता काय? कायद्यात सुधारणा करावी अशी जाहीर मागणी सर्व जनतेने केली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here