पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यास आ. जोरगेवार विधानभवनातून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात…
अश्विन गोडबोले
चंद्रपूर ब्यूरो चीफ
मो: 8830857351
मुंबई, 20 जुलै: मंगळवार 18 जुलै रोजी चंद्रपूरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहर संपूर्णतः जलमय झाले होते. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चंद्रपूर मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई विधानभवनातून थेट चंद्रपूर गाठत जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावून वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करुन तात्काळ पंचणामे पूर्ण करत नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाकडे अहवाल सादर करण्याची प्रक्रिया गतीशील करण्याच्या सुचना आ. जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना केल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह मनपा आयुक्त विपिन पालिवाल, उपविभागीय अधिकारी मुरुगनाथम, तहसीलदार विजय पवार, सिएसटीपीएसचे मुख्य अभियंता जि. एस कुमरवार, बांधकाम विभागाचे अभियंता रामटेके, महावितरणच्या मुख्य अभियंता संध्या चिवंडे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुहास पडोळे, तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, सार्वजनीक बांधकाम विभागाचे अभियंता एम. बी तांगडे, अभियंता आर. एस चव्हाण आदींची उपस्थिती होती.
अधिकाऱ्यांसोबत बैठक, नुकसान भरपाईसाठी तात्काळ पंचणामे पुर्ण करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना
पावसाळी अधिवेशनात पाँइंट आँफ इन्फाँरमेशन वर बोलतांना चंद्रपूरातील परिस्थितीकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले होते. यावेळी नुकसाणीचे पंचनामे करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना केली होती. त्यानंतर शासनाच्या वतीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्या जात असून नुकसाणीचे पंचनामे केल्या जात आहे. दरम्यान आ. जोरगेवार यांनी गुरुवारी मुंबईहून थेट चंद्रपूर गाठत जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला.
येत्या काही दिवसात पून्हा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे या दृष्टीने पुर्व उपाययोजना करण्यात याव्या, शहरातील भागात साचत असलेले पाणी मोटारद्वारे काढण्यासाठी यंत्रणा कार्यन्वीत करावी, सर्व विभागाने आपसात समन्वय ठेवावा, केवळ एका दिवसाच्या पावसाने नागरी वस्तीत पाणी साचत असेल ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे या मागची कारणे शोधून भविष्यात अश्या घटना टाळता येतील या बाबतचा आराखडा तयार करा, पावसाच्या पाण्याने काही भागात शेतीचे नूकसान झाले. या शेतीचेही पंचनामे जलद गतीने पुर्ण करुन तत्काळ शासनाकडे अहवाल सादर करा, अरुंद झालेल्या नाल्यांची पाहणी करुन त्यांच्या रुंदीकरण व खोलीकरणासाठी प्रस्ताव सादर करावा, मुसळधार पावसाची शक्यता असलेल्या दिवशी पाणबुडीत भागांमध्ये रेस्क्यू पथक तैनात ठेवण्यात यावे, सिएसटीपीएस मधुन निघणाऱ्या पाण्याचा मार्ग मोठा करण्यात यावा, कलवट ची संख्या वाढविण्यात यावी, आलेल्या तक्रारीची दखल घेत महावितरणने खंडीत विद्युत पुरवठा 24 तासाच्या आत सुरळीत करावा, ग्राहकांना तक्रार नोंदविण्यासाठी महावितरणने टोल फ्री नंबर सुरु करावा, महानगर पालिकेने पूर परिस्थिती निर्माण होत असलेल्या भागामध्ये नाल्यांची व परिसराची स्वच्छता करावी, शहरात आरोग्याच्या दृष्टिकोनातून ब्लीचिंग पावडरचा, किटक नाशक फवारणी, फॉगिंग आदी कामे नियमीत करावी, रस्त्यावर पाणी असल्यास तेथे नागरिकांच्या सोयी व सुरक्षेसाठी यंत्रना कार्यान्वित करावी आदी सूचना या बैठकीत आ. जोरगेवार यांनी संबधित अधिकाऱ्यांना केल्या.
चंद्रपूरात निर्माण झालेल्या परिस्थिती बाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सतत संपर्कात असून त्यांना येथील परिस्थितीशी अवगत करुन देत आहोत. नुकसान ग्रस्त भागात मदत करण्यासाठी सरकार सकारात्मक असुन प्रशासन म्हणून आपणही नागरिकांसोबत राहावे, या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांवर संकट कोसळले आहे. अशा काळात नागरिकांशी आपली वागणूक सौम्य, सन्मानजनक असली पाहिजे, आपण त्यांच्या दारापर्यत जाऊन त्यांचे समाधान केले पाहिजे. पावसामूळे बेघर झालेल्या नागरिकांना मदत केंद्रात ठेवून तेथे त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम प्रामाणीकपणे प्रशासनाने करावे, यात जिल्हा प्रशासन आणि महानगर पालिका प्रशासनाने विसंवाद न ठेवता समन्वय ठेवत नागरिकांची उत्तम व्यवस्था करण्यावर आपला भर द्यावा अशा सुचनाही या बैठकीत आ. जोरगेवार यांनी यावेळी केल्या. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, सायली येरणे, बंगाली समाज महिला शहर संघटिका सविता दंडारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, अल्पसंख्यांक युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, शहर संघटक विश्वजीत शाहा, अमोल शेंडे, ऍड. परमहंस यादव आदींची उपस्थिती होती.