जिवंत विजतारेच्या धक्क्याने सरपंचाचा मृत्यू
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351
चंद्रपूर, 20 सप्टेंबर
सावली तालुक्यातील बेलगाव येथील सरपंच अंबादास पाल यांचा शेतातील जिवंत विद्युत तारा चा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी घडली. बेलगाव येथील शेतकरी तथा सरपंच अंबादास पाल हे नेहमीप्रमाणे आज सकाळी आपल्या शेतात धानपिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान, शेतात विद्युत प्रवाह सुरू असलेली तार जमिनीवर पडून होती. या तारेचा स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जबर धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात वा-यासारखी पसरली आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पाथरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील कार्यवाही केली. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. अंबादास पाल यांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.