सागरी बोट रुग्णवाहिकेची रायगडवासियांना प्रतीक्षा!
सहा वर्षे उलटली तरी सरकारी अनास्थेमुळे प्रस्ताव रखडला
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: अलिबाग शहरातील जिल्हा रुग्णालयातून अत्यवस्थ असणाऱ्या रुग्णांना अत्याधुनिक सागरी बोट रुग्णवाहिका (बोट ॲम्बुलन्स) सुविधा पुरविण्याचा प्रस्ताव सरकारी अनास्थेमुळे रखडला आहे. याबाबतचां प्रस्ताव जिल्हा सरकारी रुग्णालयाने तयार करून आरोग्य विभागाकडे पाठविला आहे. मात्र सहा वर्षे उलटूनही अद्याप पर्यंत सागरी बोट रुग्णवाहिका सुरू करण्यात आली नाही. सागरी रुग्णवाहिकेमुळे जिल्ह्यातील अत्यावस्थ रुग्णांना कमी वेळेत मुंबईमध्ये आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.
त्यामुळे बोट रुग्णवाहिका लवकरच सुरू करावी अशी मागणी रायगड जिल्ह्यातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
रायगड जिल्हा औद्योगिक तसेच पर्यटनाचा जिल्हा आहे. जिल्ह्यातून मुंबई -पुणे राष्ट्रीय महामार्ग, मुंबई पुणे दुतगती मार्ग ,कोकण रेल्वे, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जातो. जिल्हा मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जात आहे. तर काही नजीकच्या कालावधीत सुरू होणार आहेत. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात एमआयडीसी प्रकल्प आहेत.त्याचप्रमाणे नवरत्न कंपन्यापैकी गेल, एचपी ,आयपीसीएल, आरसीएफ अशा कंपन्याही आहेत . त्यामुळे जिल्ह्यातील लोकसंख्या वाढलेली आहे.
आरोग्य व्यवस्थेवर त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग येथे आहे. त्या ठिकाणी जिल्हा सरकारी रुग्णालय आहे. या रुग्णालयांमध्ये जिल्ह्याच्या विविध भागातून उपचारासाठी रुग्ण घेत असतात. त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय इथूनही पुढील उपचारासाठी रुग्ण येत असतात. या ठिकाणी येणारे रुग्ण अत्यावश्य झाले तर त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे न्यावे लागते . अलिबाग मुंबई हे अंतर 120 किलोमीटर आहे त्यामुळे किमान चार ते पाच तासात अवघी लागतो. रुग्णासाठी तर प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो. त्यामुळे रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळण्यासाठी कमी अवधी मध्ये मुंबई येथे पोहोचणे गरजेचे असते. त्यासाठी सागरी मार्गाच्या पर्यायी संकल्पना जिल्हा आरोग्य विभागाने मांडली. त्यानुसार जिल्हा सरकारी रुग्णालयाने त्याबाबतचा प्रस्ताव तयार करीत तो सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र सहा वर्ष उलटूनही या मार्गावर सागरी बोट रुग्णवाहिका सुरू करण्यात आलेली नसून बोट रुग्णवाहिका लवकर सुरू करावी अशी मागणी रायगड जिल्ह्यातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
*वेळ वाचणार*
अलिबाग वरून रुग्णांना मांडवा जेटीवरून रुग्णवाहिका सागरी बोटीने गेटवे ऑफ इंडिया येथून मुंबईतील रुग्णालयामध्ये सोडण्यात येणार आहे. मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया हे अंतर हे सागरी अंतर 25 किमी आहे. त्यासाठी एक तासाचा अवधी लागणार आहे. अलिबाग ते मांडवा 21 किमी साठी पाऊण तास असे एकूण दोन तासात मुंबईला पोहोचता येणार आहे. मात्र अलिबाग मुंबई हे अंतर रस्त्याने पार करण्यासाठी साडेतीन ते चार तास वेळ लागत आहे .
*बोट रुग्णवाहिकेत असणाऱ्या सुविधा*
अत्याधुनिक सुविधानी युक्त असणाऱ्या या ॲम्बुलन्स बोटीमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यासोबत, मेडिकल रूम, मेडिकल स्टोअर, ऑक्सिजन सिलेंडर, पिण्याचे पाणी, जनरल स्टोअर, वॉश रूम, टॉयलेटची सुविधा राहणार आहे. त्याचप्रमाणे ही बोट संपूर्ण वातानुकूलित राहणार आहे किमान सात व्यक्तीची सोय आहे. त्याचप्रमाणे या बोटीवर जीपीएस ट्रॅकिंग डिवाइसही बसविण्यात येणार आहे. तसेच जनरेटरची सुविधाही देण्यात येणार आहे.