शिवाजी महाराज - आज काळाची गरज

लोकांनी निवडून दिले असले तरी सध्याचे लोकशाही राज्य व हया देशात जी कार्य चालू आहे ते येथील जनतेला आपले आहे ,आपल्यासाठी चालले आहे ,असे अजिबात वाटत नाही .तर ते या देशातील मुठभर लोकांसाठी आहे असेच वाटत आहे.

शिवाजी महाराज – आज काळाची गरज

प्रणय सोहमप्रभा,
१९ फेब्रुवारी, नागपूर: आज करोना काळात आपण पाहिलं तर देशाची आजची परिस्थिती खूप खालावलेली आहे. आज सगळीकडे धार्मिक दंगे, दहशतवाद, चंगळवाद, महागाई आली आहे. देशात राजकीय स्थैर्यता राहिलेली नाही. गरीबी वाढली आहे. दुष्काळ पडला आहे. पिकांच्या नुकसानीला आणि कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करतो आहे. जाती जातींत तेढ निर्माण झाली आहे. आधुनिकतेच्या नावाखाली संस्कृती दबत चालली आहे. लेकिबाळीवर बलात्कार होत आहेत. सरकारी यंत्रणा देश चालवण्यात कमी पडत आहे. चांगली विचारधारा बुरसटत चालली आहे. अश्या परिस्थितीमध्ये जेव्हा एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाची उणीव भासते, तेव्हा आपल्याला प्रकर्षाने आठवण येते ती छत्रपती शिवाजी महाराजांची.

त्यांचे जेवढे अवलोकन करावे तेवढे थोडेच. ते एकाच वेळी द्रष्टे, स्वातंत्र्ययोद्धे, सेनापती, संघटक, स्फूर्तिदाते, युगपुरुषोत्तम होते. त्यांच्या कुठल्याही गुणाला त्यांच्या काळातच नव्हे, तर आताच्याही कित्येक शतकांत तोड नाही. ते आदर्श नीतिवंत राजा होते .निश्चयाचा महामेरू ! अखंड स्थितीचा निर्धारू ! आज त्यांच्या विचारांची,नीतीमूल्यांची भारताला गरज आहे . आज भ्रष्टाचार, जातीभेद आणि दहशतवाद यांसारख्या समस्या वाढल्या आहेत. पण हे सगळं थांबवण्यासाठी शिवरायांचे विचार प्रत्येक मनामनांत पेरावे लागतील. तेव्हाच बद्दल घडून येईल.

अवतीभवती परकीय शक्तींची शक्तिशाली राज्य अस्तित्वात असतांना म्हणजेच उत्तरेकडे असणारा औरंगजेब, दक्षिणेला ठाण मांडून कुतुबशहा आणि आदिलशहा आणि पश्चिम किनाऱ्यावर आपला हक्क सांगणाऱ्या इंग्रज व पोर्तुगीज हे कमी होते की काय आप्त स्वकीयांचा अंतर्गत विरोध असूनही शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात यश आले .कारण त्यांच्यात राज्यकारभारातील शहाणपण उपजतच होते त्यामुळे सरदारांची अंतर्गत बंडाळी मोडून शिवाजीराजांनी या सगळ्यांचा बंदोबस्त करून स्वराज्य निर्माण केले. डोकलामच्या घटनेनंतर चीनने पुन्हा लडाखमध्ये डोके वर काढले असून सीमेवरील कारवाया वाढवल्या आहेत. पाकिस्तान आणि आता श्रीलंकेच्या सहकार्याने तो भारताची कोंडी करण्याचा डाव टाकतो आहे. अर्थात, भारताने त्याला सडेतोड उत्तर देण्याची तयारी केली आहेच. परंतु आज शिवाजीराजे असते, तर चीन आणि पाकिस्तान या शत्रूंची वारंवार हल्ले करण्याची, त्रास देण्याची हिंमतच झाली नसती.

https://www.instagram.com/p/CaJsFigKgO2/

 

आपण आज लोकशाहीत राहतो. या लोकशाहीत जनतेला ही राज्य आपली वाटतात का? आपल्या देशात जे काही आज चालले आहे ते आपल्या फायद्याचे आहे असे येथील सर्वमान्य जनतेला वाटते का ? याचे प्रामाणिक उत्तर हे ‘नाही ’ असे आहे .लोकांनी निवडून दिले असले तरी सध्याचे लोकशाही राज्य व हया देशात जी कार्य चालू आहे ते येथील जनतेला आपले आहे ,आपल्यासाठी चालले आहे ,असे अजिबात वाटत नाही .तर ते या देशातील मुठभर लोकांसाठी आहे असेच वाटत आहे .आजची जनता ही आजच्या राजा (पंतप्रधान) सोबत नाही आहे .का? आज जनतेतून कुणी हे कवितेचे धृपद म्हणेल का खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या I उडवीन राई राई एवढ्या …
परंतु अशी  कितीतरी गाणी हे शिवाजी महाराजांसाठी म्हटली जात होती. का? असे काय होते त्यांच्याकडे ? शिवाजी महाराजांनी असे काय केले होते, की प्रजेला त्यांनी आरंभलेले कार्य आपले वाटावे ? जी त्याकाळातील समकालीन किवां मागेपुढे झालेल्या राजांना प्रजेची निष्टा मिळाली नाही ,ती शिवाजी महाराजांना मिळाली.

“प्रजेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये. तसेच पिकाचे जराही नुकसान होऊ नये म्हणून दक्षता ते घेत होते .कोणत्याही मोहिमेवर जातांना कोणत्याही सैन्याच्या तुकडीने शेतकर्यांच्या उभ्या पिकातून जाता कामा नये .पिकाची नासाडी होता कामा नये .” अशी त्यांची आपल्या सैन्यांना आज्ञा होती.जनतेची ही कणव –काळजी त्या काळी कुणीही राजाने व सरंजामदाराने दाखवल्याचे आढळत नाही .राजाची ही कणव आगळी-वेगळी होती .आणि म्हणून रयतेची राजासंबंधीची निष्टा आगळी होती.

 

हे आपण वाचलंत का?

 

परंतु आज शेतकऱ्याला आपल्या आपल्या शेतमालांना हमीभाव मिळण्यासाठी मागील वर्षापासून हिंमतीने व धाडसाने आंदोलन करावे लागले .त्यासाठी त्यांना जवळपास ७०० शेतकऱ्यांच्या प्राणांची आहुती द्यावी लागली .हया आंदोलनाचा बिमोड करण्यासाठी सरकारने साम-दाम-दंड-भेद याचा भरपूर उपयोग केला.मागील शेतकऱ्यांनी २६ जानेवारी २०२१ रोजी ‘प्रजासत्ताक दिना’ला ट्रॅक्टर रॅली काढून आपला निषेध नोंदवण्याचा प्रयन्त केला त्यावेळी सरकारने त्यांच्यावर लाठीमार केला .उत्तरप्रदेशच्या लखीमपुर येथे शेतकरी आंदोलकांना चिरडण्याचाही प्रकार झाला .त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये सरकारविरुद्ध एक संतापाची लाट निर्माण झाली . अशी जर परिस्थिती राहील तर रयतेची राजासंबंधीची निष्टा कशी काय राहील. महाराजांना अन्यायाची, तसेच भ्रष्टाचाराची त्यांना अत्यंत चीड होती. भ्रष्टाचारी व अन्यायी लोकांना त्या वेळी कडक शासन केले जात होते. हया परिस्थितीत जर शिवाजी महाराज असते तर आज कोणाला न जुमानता चालू असलेले भ्रष्टाचार, अन्याय करण्याचे कोणी धाडसच केले नसते.

आजच्या या संगणकीय जगामध्ये जगणारी स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसते आणि तरीही तिच्यावर रोज अत्याचार होत आहेतच. रोज निर्भया ,आसिफा किवां प्रा .अंकिता सारखे हत्याकांड घडत आहेत .आज राजे असते तर स्त्रियांची यातून सुटका झाली असती. प्रत्येक स्त्री निर्भयपणे जगू शकली असती;खुल्या हवेत श्वास घेतली असती कारण राजे स्वतः परस्त्रीला आपल्या मातेसमान मानत असत. आणि स्त्रियांचा अपमान करणाऱ्याला हातपाय तोडण्याची किवां दोन्ही डोळे काढण्याची शिक्षा देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत.

आज, महाराजांचे नाव वापरुन राजकारण करणाऱ्यांची संख्या कमी नाही. सत्ता व मतांच्या राजकारणासाठी शिवाजी महाराज फक्त आमचेच आहेत, अशी जणू स्पर्धाच लागलेली असते. वाईट एकाच गोष्टीचे वाटते की, छत्रपतींच्या नावाचा जयघोष करणाऱ्यांचा महाराष्ट्रात सुकाळ आहे, पण त्यांच्या विचारांना कृतीत आणणाऱ्या लोकांचा मात्र दुष्काळ आहे. आपण शिवचरित्र, महाराजांच्या गुणांना किती आत्मसात केले आहे? महाराज संपूर्णत: निर्व्यसनी होते. आज आपले पुढारी, राज्यकर्ते निर्व्यसनी आहेत का? आपले राज्यकर्तेच लोकांना व्यसनाच्या आहारी ढकलू पाहत आहे .त्यामुळेच राज्यकर्त्यांनी किराणा दुकानातून वाईन देण्याची घोषणा केली आहे .जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात येत आहेत .त्यांनी आखून दिलेली जीवनपद्धती, राबवलेली राज्यपद्धती, यांचा मात्र सपशेल विसर पडलेला आहे. ज्या शिवरायांनी महाराष्ट्रासाठी जीवनऊर्जा समर्पित केली, त्यांचे जीवनचरित्र चौकटीत बंदिस्त करण्यापेक्षा त्यांच्या चरित्रावर प्राणप्रतिष्ठा करायला हवी. त्यांचे आचार-विचार आंगिकारणे हेच आपल्यासाठी आज खऱ्या अर्थाने उत्सव ठरणार आहेत.

आपल्या राज्यातील वस्तूंचा व्यापार वाढवा म्हणून परराज्यातून येणाऱ्या मालावर जबर कर वसवून स्वदेशी मालाला संरक्षण देण्याचे व देशी उद्योगास उत्तेजन देण्ण्याचे धोरण स्वीकारले होते .परंतु आज सर्व उद्योग हे विकून पुन्हा विदेशी कंपनींना भारतात आणण्याचा प्रयत्न चालविलेला आहे .देशी उद्योगधंदे बंद पाडून विदेशी उद्योगधंदे सुरु करू पाहणाऱ्यांना महाराजांनी हद्दपार केले असते .आज त्यांचे जे विचार होते की स्वदेशी मालाला संरक्षण देण्याचे व देशी उद्योगास उत्तेजन देण्याचे हे किती दूरदृष्टीचे होते हे दिसून येते.

शिवाजी महाराजांना आपल्या सैनिकांची खूप काळजी असे .जे कुणी लढाईत शहीद होत असत त्यांच्या मुलाबाळांची ते जातीने काळजी घेत होते .सोबतच त्यांच्या शूर –पराक्रमी सैन्याबद्दल कुणी ब्र शब्द काढला तर ते जातीने चौकशी करीत असत व कुणी जाणूनबुजून करणाऱ्याला जबर शिक्षाही करीत असत .आज शिवाजी महाराज असते आणि कुणी जर असे म्हणाले की आपल्याला जे स्वतंत्र १९४७ ला मिळाले ते भिक आहे ? हे ऐकूनच त्यांनी त्या व्यक्तीची जीभ कापली असती व पुन्हा आपल्या स्वतंत्रसैनिकांबद्दल असे अपमानास्पद शब्द भविष्यात कुणी उच्चारणार नाही असे फर्मान काढले असते .

शिवाजी महाराजांच्या काळातील वतने  आता नाहीत हे खरे .पण नवी वतने आणि वतनदार वाढत आहेत.झेडपी ची वतने सर्व जिल्हात आहेत .साखरसम्राट म्हणजे नवे वतनदारच आहेत .वेगवेगळ्या कार्पोरेशन म्हणजे वतनदारी आहे .मोठ्या सहकारी संस्था ,मनुन्सिपालटया,आमदारक्या,खासदारक्या यांना वतनाचे स्वरूप आले आहे .आणि हया वतनदार्ऱ्या आता वंशपरंपरेने दिल्या जात आहेत .लोकशाहीत सत्तेचे विकेंद्रीकरण हवेच,त्याला विरोध कुणी करणार नाही .पण विकेंद्रीकरण म्हणजे वतनदारी नव्हे.शिवाजीच्या काळी जसे वतनदार जनतेला छळीत त्यापेक्षा हे वतनदार जास्त छळतात. साखरसम्राटच्या विरुद्ध कुणी गेला तर तो संपलाच .त्याला कर्ज मिळत नाही ,खत मिळत नाही,त्याचा उस विकल्या जात नाही .एक-दोन वर्षात तो बरबाद होतो आणि त्रासून आत्महत्या करतो.आणि हे सारे ‘शिवाजी महाराज की जय ’म्हणत सुरु असते.हे अगदीच भयानक .शिवाजी महाराज हे सारे पाहायला असता तर? त्यांनी काय केले असते ? ते येणार नाहीत हे त्रिवाद सत्य आहे .पण त्यांची शिकवण आहे ना ?त्यांची शिकवण अंगी बाळगून नव्या वतनदारांवर प्रहार करणे हेच खरे शिवाजीचे स्मरण होय.

आज महाराज असते तर लोकशाही राज्यापाढती, धर्मनिरपेक्षता या भारताने स्वीकारलेल्या मूल्यांचे खऱ्या अर्थाने पालन झाले असते. सांस्कृतिक मुल्यांची जपणूक, सांस्कृतिक वर्षांचे जातं, कर्तव्यदक्ष शासन, स्वच्छ राज्यकारभार इत्यादींचे जतन झाले असते. भारत एक वैभवशाली राष्ट्र म्हणून नावारूपाला आले असते त्याचबरोबर परकियांच्या मनामध्ये भारताबाबत आदरयुक्त दबदबा निर्माण झाला असता.

हे आपण वाचलंत का?

 

शिवाजी महाराज त्यांचे काम करून गेले. आता आपली वेळ आहे. जरी आज ते नाही तरी त्यांच्या तत्वांवर आपण चालले पाहिजे. स्त्रियांची रक्षा करणे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आज त्यांच्या नावाचा वापर करून काही जण राजकारण करत आहेत. शिवरायांच्या नितीमुल्यांचा आजकाल तरुणपिढी अवलंब करताना दिसत नाही. काहीजण त्यांच्यासारखी दाढी वाढवून स्वतःला त्यांचे भक्त म्हणवून घेत आहेत. पण त्याने ते मावळे होणार नाहीत. त्यासाठी आधी त्यांच्यासारखे वागायला शिकले पाहिजे. शिवरायांच्या सैन्यात वेगवेगळ्या जातीचे मावळे होते. ते जातीभेद मान्य करत नव्हते. पण तरीही आज आपण त्यांना एका जातीत अडकवून ठेवले आहे. एका रंगात विभागून दिले आहे. शिवराय महाराष्ट्राचे राजे होते. म्हणून ते प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाचे आदर्श आहेत. आज भ्रष्टाचार, जातीभेद आणि दहशतवाद यांसारख्या समस्या वाढल्या आहेत. पण हे सगळं थांबवण्यासाठी शिवरायांचे विचार प्रत्येक मनामनांत पेरावे लागतील. तेव्हाच बद्दल घडून येईल.
— इंजि .प्रणय सोहमप्रभा ,नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here