
प्रणय सोहमप्रभा
१७ मार्च, नागपूर: जे वाईट असेल ते होळीमध्ये जळून जाईल. चांगल्या विचारांचा, चांगल्या सुभाषितांचा शिमगा करा. अपशब्दांची, शिव्यांची होळी करा. हा सण पौराणिक काळापासून सुरू आहे. होळी सणाचा संदेश वाईट गोष्टींना जाळून चांगल्या गोष्टींचे संरक्षण करणे असा होतो. होळी म्हणजे रंगांचा सण. त्यानिमित्त सर्वांनी एकत्र येऊन रंगांची उधळण करा. परंपरा जपत होळी नक्की बांधा; पण त्यासाठी वृक्षतोड करू नका. टाकाऊ पदार्थांची होळी करा. ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून शक्य तितक्या सुक्या आणि इकोफ्रेंडली रंगांनी होळी खेळा. होळी साजरी करताना आनंद घ्या; पण पाण्याचा अपव्यय टाळा. एक दिवसाच्या आनंदासाठी हजारो लिटर पाणी वाया घालवू नका. जनावरांनाही पाणी मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. आपणही त्याच समाजाचा भाग आहोत, याचे भान असू द्या.
‘होळी’ हा सण १७ मार्च रोजी तर दुसर्या दिवशी १८ मार्चला ‘धूलिवंदन’ आहे. होळी हा हिंदूंचा सांस्कृतिक व धार्मिक सण आहे. या सणाचे महत्त्व म्हणजे, आपल्यामधील दुर्गुण होळीत टाकून त्यांचे रूपांतर सद्गुणांमध्ये, चांगल्या गुणांमध्ये होऊन आपण चांगले वागू, असा संकल्प केला जातो.
शहरांमध्ये तसेच खेडेगावांमध्ये अनेक ठिकाणी होळी सणानिमित्त होळ्या पेटविण्यात येतात. होळी पेटविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाकडे आणि शेणाच्या गोवर्यांचा वापर केला जातो. रात्रभर या होळीमध्ये लाकडे आणि गोवर्या जाळल्या जातात. यावेळी अनेक चांगली हिरवीगार झाडे तोडली जातात, कापली जातात आणि वाळलेल्या ओल्या शेणाच्या गोवर्या होळीमध्ये जाळत असतात. काही तरुण लोकांकडून वर्गणीद्वारे तर काही मुले चोरी, जबरदस्ती करून ऐनकेनप्रकारे वखारीतून, इतर ठिकाणातून, घरांमधून लाकडे जमा करून त्यांची होळी करीत असतात. या होळीमुळे वातावरणात हवा दूषित होते व हवेचे प्रदूषण होते तसेच पर्यावरणाचे संतुलन बिघडत असते. आर्थिक नुकसान होत असते. भारतात आज फक्त १२ ते १३ टक्के जमीन जंगलाखाली आहे. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने हे प्रमाण ३३ टक्के असायला हवे. कारण अवैध वृक्षतोड, जंगलतोड मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.
प्राचीन काळात व मध्ययुगीन काळात जंगले मोठ्या प्रमाणावर होती, झाडे मोठ्या प्रमाणावर होती. आज आधुनिक काळात भारतात स्वातंत्र्य मिळाले त्या वेळेस भारताची लोकसंख्या ३५ कोटी होती. लोकसंख्यावाढीचा वेग मोठ्या प्रमाणावर असून आज भारताची लोकसंख्या १३० कोटींच्या पुढे जाऊन पोहोचली आहे. लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे. ही वाढती लोकसंख्या पर्यावरणाची अतोनात हानी करीत आहे. अन्न शिजविण्यासाठी मानवाला लाकडे, गोवर्या, रॉकेल, गॅस इत्यादी इंधनाची गरज असते. गोरगरीब जनतेजवळ पैसा नसल्यामुळे त्यांना गॅस घेणे परवडत नाही. त्यामुळे भारतात वृक्षतोड, जंगलतोड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळेच पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. वृक्षांना वाचविणे आवश्यक आहे. ‘झाडे लावा-झाडे जगवा!’ वृक्षांचे अनेक फायदे आहेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञापत्रात वृक्षांचे महत्त्व सांगितले असून ‘रयतेने ही झाडे लावून लेकरांसारखी बहुतकाळ जतन करून वाढविली ती झाडे तोडिलियावरी त्याचे दु:खास पारावर काय?’ वृक्षांची काळजी घेण्याबाबतीत छत्रपती शिवाजी महाराज स्वत: किती दक्ष होते, हे त्यांच्या आज्ञापत्रावरून दिसून येते. संत तुकाराम महाराज यांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे वृक्षांचे महत्त्व सांगताना म्हटले आहे. आपण राहतो तेथील सभोवतालचा परिसर म्हणजे आपले ‘पर्यावरण’ होय. पृथ्वी किंवा पृथ्वीवरील कोणत्याही भागातील सजीव व निर्जीव घटकांमुळे निर्माण झालेली परिस्थिती म्हणजे ‘पर्यावरण’ होय. ‘झाडे लावा – झाडे जगवा!’ मिळेल शुध्द ताजी हवा. झाडांपासून मानवाला आणि प्राण्यांना सावली मिळते. झाडे वातावरणात गारवा निर्माण करतात. झाडे हवेतील दूषितपणा कमी करतात. झाडे हवेमध्ये प्राणवायू सोडतात आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. त्यामुळे हवा शुध्द राहते.
हे आपण वाचलंत का?
- समाजाच्या प्रगतीची केंद्र बनलेल्या आदर्श बुद्धविहारांचा “शोध आदर्श बुद्धविहारांचा” या मीडियावार्ताच्या उपक्रमाद्वारे होणार सन्मान
- २० लाख रुपये इनामी असलेल्या २ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
होळीमध्ये नैवेद्य म्हणून पुरणपोळी टाकली जाते. भारतीय संस्कृतीत अन्न हे परब्रह्म आहे. ते कोणत्याही कारणांनी अग्निमध्ये जाळण्यासाठी टाकणे हे कितपत योग्य वाटते? भारतात कोट्यवधी लोकांना खाण्यासाठी अन्न मिळत नाही. त्यांना उपाशीपोटी जीवन जगावे लागते. अशावेळी होळीत अन्न टाकले जाणे योग्य आहे काय? याचा विचार संबंधित बंधू-भगिनींनी करावा. होळीच्या लाकडांवर नागरिक पाणी गरम करतात व या पाण्याने अंघोळ करतात, म्हणजे रोगराई होत नाही, अशी लोकांची अंधश्रध्दा पाहावयास मिळते. जर असे असते तर आपल्याला करोना झालाच नसता .त्यामुळे हया गोष्टी सुद्धा लक्षात घेण्याजोग्या आहेत .नजीकच्या भविष्यकाळात आपल्याला लाकडे आणि पाणीही मिळणे कठीण होईल. होळीमध्ये पुरणपोळी टाकण्यात येऊ नये. ती गोरगरीब गरजूंना खाण्यासाठी देण्यात यावी. अमंगलाची होळी करावी, दुर्गुणांची होळी करावी. एका गावात एकच छोटी होळी करावी. त्यामध्ये केरकचर्याच्या होळ्या पेटवा. लाकडांच्या होळ्या पेटवू नका, होळी सणाला अंधश्रध्देचे रूप न देता काळानुसार सण साजरा करावा. प्रदूषणविरहित सण साजरे करावेत. पर्यावरण रक्षणासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरण्यासाठी आधुनिक पध्दतीने होळी साजरी करावी. जनतेचे प्रबोधन व्हावे, लोकशिक्षण व्हावे, जनजागृतीसाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी, प्रदूषण टाळण्यासाठी भारतीय राज्यघटना कलम ५१-क मध्ये भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये सांगितली आहेत –
1) वन, सरोवरे, नद्या आणि वन्य जीवसुष्टी यांच्यासह नैसर्गिक गोष्टींचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणिमात्रांबद्दल दया बाळगणे.
2) वैज्ञानिक दृष्टिकोन, दयाळूपणा आणि चौकशी व सुधारणा यांचा विकास करणे
3) सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे तसेच हिंसाचारापासून दूर राहणे या नागरिकांच्या कर्तव्यांचा विचार बंधू-भगिनींनी करावा.
होळीचे महत्व
‘वसंत’ ऋतूला ऋतुराजा असे म्हणतात. त्यात जास्त उष्णताही नसते किंवा जास्त थंडीही नसते. तो एक अतिशय आनंददायी हंगाम आहे. या काळात जंगलांमध्ये नव्या जीवनाची सुरूवात होते. झाडांना नव्या पालव्या फुटू लागतात. रंगीबेरंगी फुले तुम्हाला सावलीने मोहित करु लागतात. कोकिळा मधुर संगीत उत्पन्न करते. झाडांना बहराचा आणि फुलांचा वास देखील येतो. हे निसर्गाचे सौंदर्य, हे सौंदर्य होळीची प्रेरणा आहे.
या काळात गहू आणि बार्ली पिकण्यास सुरवात होते. तर काही भागात पीक कापण्यास सुरुवात होते. कापणीच्या आनंदात शेतकरी नाचतात. मोहरीच्या पिवळ्या फुलांचे सौंदर्य शेतांना सुशोभित करतात. निसर्गाचे चे रूप पाहून माणूसही उत्सव साजरे करण्यास सुरुवात करतो. कदाचित हे या सणाच्या स्थापनेचे मूळ कारण आहे.
होळीचे बदललेले रूप
आजकाल होळी साजरी करण्याचे स्वरूप बदलले आहे. आजकाल काही लोक होळीच्या दिवशी मादक पदार्थांचे सेवन करतात, अश्लील गाणी गातात, जुगार खेळतात, त्यामुळे होळीचा खरा आनंद कमी होतो. आपण असे कृत्य न करता होळी साजरी करण्याच्या खऱ्या कारणाकडे लक्ष दिले पाहिजे. आपण एक आनंदी, उत्साही व रंगबेरंगी होळी साजरी केली पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन आनंद व्यक्त करून आपापसातील नाते मजबूत करणे, यासाठी आपण होळी साजरी करतो. म्हणून आपण हे वाईट कृत्य करणे बंद केले पाहिजे, व होळी साजरी करण्याचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे.
रासायनिक रंगांमुळे अशा प्रकारे होते नुकसान
जेव्हा हे रंग आपल्या त्वचेवर लावले जातात, तेव्हा यामुळे खाज सुटणे, लालसरपणा, पुरळ, पुळ्या इत्यादी दुष्परिणाम होऊ शकतात. परंतु, जर हे रंग डोळ्यांत गेले तर ते इतके धोकादायक असू शकते, ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या रंगांमुळे डोळ्यांमध्ये खाज सुटणे, जळजळ होणे, एलर्जी या सामान्य समस्य व्यतिरिक्त, यातील रसायनामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी देखील जाऊ शकते. हिरव्या रंगामुळे विशेषतः डोळ्यांना मोठे नुकसान होऊ शकते.
हे आपण वाचलंत का?
- विरोधात असताना अयोग्य, सत्तेत असताना योग्य: गोंधळ ईव्हीएमचा
- अनुयायांची आंधळी श्रद्धा मिळवून देणारी भोंदूबाबांची काळी जादू आणि त्यामागचे विज्ञान
- राज्यातील तरुणांसाठी खुशखबर, लवकरच पोलीस दलातील ७ हजार २३१ पदांची होणार भरती
कर्करोगाचा धोका वाढवणारे लाल आणि सिल्व्हर रंग
सिल्वर आणि लाल रंगात कार्सिनोजेनिक घटक आढळतात. अशा परिस्थितीत त्वचेवर हे रंग लावल्यानंतर, सूर्यप्रकाशाच्या तीव्र प्रकाशामुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो. आपण जर दम्याचे रुग्ण असाल, तर रासायनिक रंग आपल्यासाठी आणखी गंभीर समस्या बनू शकतात. म्हणूनच, या रंगांनी होळी खेळण्याऐवजी आपला सण नैसर्गिक रंगांनी साजरा करणे चांगले.
त्यामुळे मित्रांनो ,काळाचे भान ओळखा, वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरा आज भारतात प्रचंड लोकसंख्या, प्रचंड बेकारी, उपासमार, पाण्याची तीव्र समस्या, पर्यावरण व प्रदूषणाच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत याचा जनतेने विचार करूनच होळी साजरी करावी .अन्यथा याचे दुष्परिणाम आपल्यालाच येणाऱ्या काळात भोगावे लागतील.