धानाला बोनसची फक्त घोषणाच,दोन महिने उलटले, शासन निर्णयाकडे धान उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष
✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.9373472847📞
भंडारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात धानाला हेक्टरी २० हजार रुपये बोनस जाहीर केला. दुष्काळी स्थितीत सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतल्याने समाधान व्यक्त झाले. पण, दोन महिने उलटूनही बोनससंबंधी शासन निर्णय काढण्यात आलेला नाही. धानपट्ट्यातील लोकप्रतिनिधी या मुद्द्यावर गप्प असल्याने संताप वाढू लागला आहे.
*बोनसची फक्त घोषणाच*
शेतकऱ्यांना दरवर्षी महागाईला सामोरे जावे लागते. शेतीमधील त्यांचा खर्च भागावा यासाठी राज्य शासनाकडून बोनसची परंपरा सुरू करण्यात आली. डिसेंबर २०१३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सरकारने पहिल्यांदा धानाला बोनस जाहीर केला होता. सन २०१८-१९ मध्ये त्यात वाढ होऊन ५०० रुपयांचा बोनस दिला गेला. २०२०-२१ मध्ये बोनसची रक्कम वाढवून ७०० रुपये प्रति क्विंटल करण्यात आली. २०२२ मध्ये १५ हजार हेक्टरी बोनस जाहीर झाला. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोनसची घोषणा हिवाळी अधिवेशनात करू, असे जाहीर केले. यानंतर १८ डिसेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्र्यांनी धानाला बोनसची घोषणा केली. दोन हेक्टरच्या मर्यादेत बोनस दिला जाणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय काढून अंमलबजावणी करणे आवश्यक होते. घोषणेला ६० दिवसांहून अधिकचा काळ लोटूनही सरकारी हालचाली दिसत नसल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे.
मागील खरीप हंगामात कीड, अवकाळी पावसामुळे धानाचे अपेक्षित उत्पादन झाले नाही. ऐन कापणीवर आलेले धान अवकाळी पावसामुळे खराब झाले. धानाच्या कडपा पाण्यात सापडल्याने त्यांना अंकुर फुटले होते. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना जाहीर झालेले बोनस तत्काळ वाटप करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.