पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेस अर्ज करण्यास २ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
विनायक सुर्वे प्रतिनिधी
वाशिम :- राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेचा शुभारंभ नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. या योजनेमुळे भाजीपाला पिकांची दर्जेदार व कीडमुक्त रोपे निर्मिती उत्पादनात वाढ होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना प्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या योजनेसाठी ‘महाडीबीटी’ संकेतस्थळावर अथवा तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करण्यास २ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ६.१५ वा. पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. लाभार्थ्यांची निवड सोडत पद्धतीने तालुकास्तरावर ३ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या कालवधीत सोडत प्रक्रियेने होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी कळविले आहे.
या योजनेमध्ये प्रामुख्याने कृषि पदवी किंवा पदविकाधारक, महिला बचत गटास प्राधान्य देण्यात येणार आहे. योजनेचा कालावधी २ वर्षाचा आहे. योजनेची अंमलबजावणी तालुकास्तरावरून करण्यात येणार आहे. योजनेंतर्गत एकूण प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त २ लक्ष ३० रुपये या प्रमाणात अनुदान देय राहील. पहिल्या टप्प्यात देय अनुदानाच्या ६० टक्के अनुदान व रोपांची विक्री सुरु झाल्यानंतर ४० टक्के अनुदान आधार सलंग्न बँक खात्यात जमा केले जाईल.
या योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७ व अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता ३ असे करून १० रोपवाटिका निर्मितीचा लक्षांक असून याअंतर्गत प्रत्येक तालुक्यात किमान १ रोपवाटिका निर्मिती होईल, यादृष्टीने नियोजित आहे. त्यानुसार सर्वसाधारण प्रवर्गासाठी वाशिम तालुक्यात २ तर उर्वरित पाच तालुक्यांमध्ये प्रत्येकी १ रोपवाटिका निर्मिती, तसेच अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता मंगरूळपीर, कारंजा व मानोरा तालुक्यात प्रत्येकी १ रोपवाटिका निर्मितीचा लक्षांक नियोजित आहे. योजनेसाठी यापूर्वी २ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर दरम्यान आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र आता अर्ज करण्यास २ नोव्हेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे श्री. तोटावार यांनी कळविले आहे.