राणी माँ यांच्या आशीर्वादाने महिलांचा जल्लोष

25

नेरळमध्ये ‘खेळ रंगला पैठणीचा’ यशस्वी

संदेश साळुंके 

कर्जत रायगड 

९०१११९९३३३ 

महिलांच्या सक्रिय सहभागातून सामाजिक संवाद आणि मनोरंजन यांची प्रभावी सांगड घालणारा ‘खेळ रंगला पैठणीचा’ हा लोकप्रिय होम मिनिस्टर कार्यक्रम नेरळ येथे काल रात्री मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

नेरळ व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आयोजकांच्या वतीने प्रत्येक सहभागी महिलेला साडी भेट देण्यात आल्याने कार्यक्रमाचे आकर्षण अधिकच वाढले.

या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. शिल्पा ललित जैन (राणी माँ) — शुभम ज्वेलर्स, पार्श्वनाथ गोल्ड यांच्या सौजन्याने तसेच जिल्हा प्रमुख–जिल्हा बांधकाम कामगार सेना यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

दिवंगत ललित शेषमल जैन (पप्पू शेठ) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिन

भाऊ इंगळे (सनी भाऊ) — कोकण प्रमुख, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेना तसेच शिवसेना जिल्हा परिषद, नेरळ विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमास कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळे तसेच शांताराम इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याशिवाय सामाजिक कार्यकर्ते सदानंद बाळकृष्ण जाधव, आबासाहेब पवार, अंकुश दाभणे, केतन पोतदार यांचीही उपस्थिती लाभली.

महिलांसाठी विविध फेऱ्यांतील खेळ, प्रश्नोत्तरे, उखाणे तसेच सांस्कृतिक सादरीकरणांचे आयोजन करण्यात आले होते.

महिलांनी आत्मविश्वासाने सहभाग घेत कार्यक्रमात रंगत आणली. त्यांच्या उत्साही प्रतिसादामुळे छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आनंदी व उत्सवमय वातावरण निर्माण झाले.

स्पर्धेत प्रथम क्रमांकास स्कुटी व पैठणी, द्वितीय क्रमांकास एलईडी टीव्ही व पैठणी, तृतीय क्रमांकास वॉशिंग मशीन व पैठणी, चतुर्थ क्रमांकास वॉटर फिल्टर व पैठणी, तर पाचव्या क्रमांकास मिक्सर व पैठणी देण्यात आली.

उर्वरित सर्व सहभागी महिलांनाही आकर्षक पैठणी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली हिंदवी पाटील यांची लावणी, जिने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध गायक व निवेदक हरीश मोकल यांनी केले.

आयोजनात सुरेश टोकरे (माजी रा. जि. प. अध्यक्ष), ज्ञानेश्वर भगत तसेच नेरळ येथील महिला पदाधिकारी उमा खडे, गीतांजली देशमुख व इतर कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

समारोपप्रसंगी मान्यवरांनी महिलांसाठी अशा सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची गरज अधोरेखित केली. महिलांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाल्यास कुटुंब व समाजात सकारात्मक बदल घडतात,

असे मत व्यक्त करण्यात आले. एकूणच ‘खेळ रंगला पैठणीचा’ हा कार्यक्रम महिलांच्या सशक्त सहभागातून सामाजिक जाणीव वृद्धिंगत करणारा ठरला.