राजस्थान विधानसभेत ‘भूत’; आमदार भयभीत

55

जयपूर:राजस्थान विधानसभेच्या वास्तूमध्ये ‘भूत’ किंवा ‘आत्मा’ वास्तव्यास आहे, अशी शंका काही आमदारांनी व्यक्त केली आहे. या भूतांनी सर्वांनाच पछाडलं आहे. सभागृहात २०० सदस्यसंख्या फार काळ टिकून राहत नाही. कुणी राजीनामा देतं, कुणी तुरुंगात जातं, तर कुणाचा मृत्यू होतो. या मागे विधानसभेतील ‘आत्मा’ असल्याचा त्यांचा समज आहे.
भूतानं पछाडलेल्या काही आमदारांनी तर चक्क मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची भेट घेतली. एखाद्या पुजाऱ्याला बोलावून पूजा-अर्चा करून भूतं-आत्मांना शांत करावं, असं अजब साकडं त्यांना घातलं आहे. आश्चर्य म्हणजे, गुरुवारी विधानसभा परिसरात प्रवेशद्वाराजवळ एका पुजाऱ्याला पूजा-अर्चा करताना काहींनी पाहिलं आहे.
एका स्मशानभूमीच्या जागेत विधानभवन उभारण्यात आलं आहे. त्यामुळं या वास्तूत भूतांचं वास्तव्य आहे, असा आमदारांचा समज आहे. त्यात भाजप आमदार कल्याणसिंह चौहान यांचं मंगळवारी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर आमदार अधिकच घाबरले आहेत. या ‘भूत’बाधेवर उपाय करा, अशी विनंती काही आमदारांनी केल्याचं सांगण्यात येतं.