आतापर्यंत १३५ मृत कासवानां तलावातून बाहेर काढले असून ११ जिवंत कासवं बाहेर काढण्यात कर्मचाऱ्यांना यश
सिद्धांत
२४ जानेवारी २०२२: कल्याण मधील गौरीपाडा तलावामध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आतापर्यंत १३५ कासवं मृतावस्थेत आढळून आली आहेत. तलावाची तपासणी चालून असून मृत कासवांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या आठवड्यात स्थानिकांना तलावातून दुर्गंध येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलावाची तपासणी केली असता, तलावातील कासवे मृतावस्थेत आढळून आली. आतापर्यंत १३५ मृत कासवानां तलावातून बाहेर काढले असून ११ जिवंत कासवं बाहेर काढण्यात कर्मचाऱ्यांना यश मिळाले होते. परंतु वाचलेल्या ११ कासवांपैकी २ कासवांचे निधन झाले.
तलावातील कासवांच्या अशा अचानक मृत्यूंचे कारण अजूनही समोर आले नसून मृत कासवानां शव विच्छेदनसाठी संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये पाठवण्यात आले आहेत. तसेच तलावातील पाण्याचे नमुने तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
या तलावामध्ये जवळच्या रहिवासी झोपडपट्टीतील सांडपाणी सोडले जाते. तसेच ह्या तलावामध्ये अवैधरित्या गोड्या पाण्यातील माश्यांची मासेमारी केली जाते. ह्यामुळे तलावातील कासवानां विषबाधा झाला असल्याची अंदाज व्यक्त केला जात आहे.
मृत पावलेली कासवं कोणत्या प्रकारची?
कल्याणच्या गौरीपाडा तलावामध्ये भारतीय ‘फ्लॅपशेल’ प्रकारची कासवे सापडत होती. भारत आणि दक्षिण आशिया मधील देशांमध्ये ह्या प्रकारची कासवे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
वनविभाकडून या घटनेची सखोल चौकशी चालू असून कासवांच्या मृत्यूमागचे कारण लवकरात समोर येईल असे वनविभागाकडच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.