‘एमसीक्यू’ पध्दतीनेच होणार परीक्षा
येत्या 10 जून पासून परीक्षेला सुरुवात
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📞 8830857351
गोंडवाना विद्यापीठाच्या येत्या सत्रातील उन्हाळी परीक्षा बहुपर्यायी पध्दतीने (MCQ Method) उन्हाळी 2022 च्या सर्व ‘ओएमआर’ पध्दतीने होणार असून, त्याचे संपूर्ण वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार असल्याची घोषणा, अनिश्चितततेच्या सावटात मंगळवार, 24 मे रोजी गोंडवाना विद्यापीठाने केली आहे. हा निर्णय घेताना विद्यापीठावर अभाविपसह साऱ्याच विद्यार्थी संघटनांचा दबाव होता. तर परीक्षा पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ‘ऑफ लाईन’ मात्र नेहमीच्या प्रचलित पध्दतीने सविस्तर उत्तरांचीच घ्यावी, अट्टाहास विद्यापरिषदेचा होता. आधी जाहीर निर्णयाप्रमाणे 1 जून 2022 पासून सर्व परीक्षा प्रचलित पध्दतीनेच ‘ऑफलाईन’ घेतल्या जाणार होत्या. मात्र, मंगळवारी या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या. आता मात्र, विद्यापीठाच्या परीक्षा पध्दतीत बदल करण्यात आला असून, सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा या येत्या 10 जून 2022 पासून बहुपर्यायी पध्दतीने ‘ऑफलाईन’च होतील.
शेवटी, याबाबतचा अंतिम निर्णय कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्यावरच सोपवू, असे जाहीर केले. शेवटी मंगळवारी डॉ. बोकारे यांनी, येत्या 10 जूनपासून ‘ऑफलाईन’, ‘एमसीक्यू’ आणि ‘ओएमआर’ पध्दतीने (MCQ Method) नुसार परीक्षा होणार असल्याचा निर्णय घेतला गेला आणि तसे परिपत्रक डॉ. चिताडे यांनी काढले. या निर्णयाने एकीकडे विद्यार्थी संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे विद्या परिषदेचे बहुतांशी सदस्य नाराज असल्याचे कळते. आधी जाहीर केलेली परीक्षेची तारीख ही अवघ्या सात दिवसांवर येऊन पोहोचली असताना, परीक्षेच्या पध्दतीत बदल करणे विद्यापीठासाठी व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी परवडणारे नाही असे मत विद्यापरिषशदेच्या सदस्यांनी नोंदविले. गोंडवाना विद्यापीठाने अगोदर बहुपर्यायी पध्दतीनेच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. तसे परिपत्रकही 22 एप्रिल रोजी प्रसिध्द केले होते. पण त्यानंतर सहाच दिवसात तो निर्णय फिरवून 28 एप्रिल रोजी पारंपारिक पध्दतीने ‘ऑफलाईन’ आणि सविस्तर उत्तरांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला गेला. विद्यार्थ्यांना कोवीडच्या दोन वर्षात अशा पध्दतीच्या परीक्षा देण्याची सवय नसल्याने या परीक्षेचा कालावधी हा 3 तास 45 मिनिटांचा ठेवण्यात आला होता. 1 जूनपासून या पध्दतीने परीक्षा होणार होती. पण विद्यार्थी संघटनांचा दबाव वाढला. सर्व संघटनांनी निवेदन देऊन कुलगुरूंना घेराव घातला. शिवाय, अन्य विद्यापीठांनीही बहुपर्यायी परीक्षा पध्दती जाहीर केल्याने शेवटी गोंडवाना विद्यापीठाला आपला निर्णय बदलवून बहुपर्यायी पद्धतीचा अवलंब करावा लागला.