विद्यार्थ्यांनो, बदलत्या काळात दररोज नवीन ज्ञान आत्मसात करा! • सुधीर मुनगंटीवार यांचा सल्ला

विद्यार्थ्यांनो, बदलत्या काळात दररोज नवीन ज्ञान आत्मसात करा!
• सुधीर मुनगंटीवार यांचा सल्ला

विद्यार्थ्यांनो, बदलत्या काळात दररोज नवीन ज्ञान आत्मसात करा! • सुधीर मुनगंटीवार यांचा सल्ला

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 25 जून
आमच्या पिढीवर शिक्षण घेताना जो ताण होता, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने आजच्या पिढीवर आहे. प्रत्येक गोष्ट वेगाने बदलते आहे. आधी शिक्षक सांगायचे की बारा कोसावर भाषा बदलते. आजचे शिक्षक सांगतात की, बारा दिवसांमध्ये तंत्रज्ञान बदलते. पूर्वी एक उद्योग सत्तर वर्षे एकाच तंत्रज्ञानाच्या आधारावर चालायचा, मात्र आता दरवर्षी नवीन तंत्रज्ञान स्वीकारले नाही तर उद्योग चालत नाहीत. त्यामुळे या बदलत्या काळात आपण दररोज नवीन ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर येथील आर्य वैश्य स्नेह मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च येथील शास्त्रज्ञ प्रो. डॉ. विवेक पोलशेट्टीवार यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. याशिवाय संस्थेचे अध्यक्ष विजय गंपावार, सचिव नीरज पडगिलवार, कोषाध्यक्ष मनोज राघमवार, जयंत बोंनगीरवार, अभय निलावार, विलोक राचलवार आदींची उपस्थिती होती.
मुनगंटीवार यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘आई, आजी आणि शिक्षक आपल्याला अनेक छोट्या-छोट्या कथा सांगतात. त्या कथांचा मतितार्थ समजून घ्यावा. कारण त्यातूनच आपल्या जीवनाला दिशा मिळत असते. यशस्वी लोक वेगळे काम करीत नाही, ते वेगळ्या पद्धतीने काम करीत असतात. ज्याने बल्बचा शोध लावला त्या थॉमस अल्वा एडिसनला प्रयोग यशस्वी होण्यापूर्वी 50 हजार प्रयोग करावे लागले होते. त्यानंतर त्याचा प्रयोग यशस्वी झाला. बल्बचा शोध लागल्याची माहिती पत्रकारांना देत असताना एका पत्रकाराने प्रश्न केला की ‘50 हजार प्रयोग केल्यानंतरही यश आले नसते तर तुम्ही काय केले असते?’ त्यावर एडिसनने उत्तर दिले की ‘अपयश आले असते तर मी इथे तुमच्यापुढे बसलो नसतो, पुन्हा एकदा पुढच्या प्रयोगाची तयारी सुरू केली असती.’ आपले जीवन असे असले पाहिजे. न थांबता, हताश न होता, यशापयशाची चिंता न करता सदैव प्रामाणिक प्रयत्न करीत राहिले पाहिजे,’ असेही मुनगंटीवार विद्यार्थ्यांना म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here