माणिपूर येथील घटनेचा निषेधार्थ उद्या नंदूरबार जिल्हा बंद…नंदुरबार जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन
प्रकाश नाईक
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी
मो. 📲 9511655877
मणिपूर राज्यातील कांगपोकपी येथील २ आदिवासी महिलांना निर्वस्त्र करत,त्यांचे लैंगिक शोषण करत एका जमावाने रस्त्यावरून धिंड काढली.त्या घटनेचा निषेध म्हणून नंदूरबार जिल्ह्य़ातील समस्त आदिवासी समुदायच्या वतीने दिनांक २४ जुलै २०२३ रोजी जिल्हाधिकारी नंदूरबार मनिषा खत्री व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. मणिपूर येथील आदिवासी समुहावर गेल्या ३ ते ४ महिन्यापासून सामाजिक, राजकीय व प्रशासकीय अत्याचार सुरू आहे. दोन आदिवासी महिलांवर घोर अत्याचार केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल झाला आहेत. तो बघून देशातील संपूर्ण आदिवासी समुदाय त्या घटनेचा निषेध व्यक्त करत आहेत.
सदर घटना अखंड मानवजातीला काळीमा फासणारी असून आदिवासींना कीडे-मकुडे समजून त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. या देशात आदिवासींवर कुणी लघुशंका करतोय ( मध्यप्रदेश) तर कुणी बुटद्वारे पाणी पाजतोय ( राजस्थान) तर कुणी हाॅटेल सिसाॅर्ट मध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनींना नाच करायला लावतोय ( महाराष्ट्र) अशा देशभरात अनेक घटना दिवसेंदिवस घडत आहेत. तसेच आदिवासींचे आरक्षण खोट्या आदिवासींच्या हडप करण्यात येत आहे.
मणिपूर मध्ये घडलेल्या अमानवीय दुष्कृत्य व अत्याचार याचा जाहीर निषेध म्हणून नंदूरबार जिल्ह्य़ातील समस्त आदिवासी समुदायाकडून दिनांक २६ जुलै २०२३ बुधवार रोजी सकाळी ७ ते सायंकाळ ५ वाजेपर्यंत संपूर्ण नंदूरबार जिल्हा बंद करण्याची घोषणा, हाक,आवाहन करण्यात आले आहे.या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळून जिल्ह्य़ातील सर्व तालुके व बाजारपेठा बंद ठेवण्याचे आवाहन समस्त आदिवासी समुदायाकडून करण्यात आले आहे.
आपण सर्व नंदूरबार जिल्हा वासी,नंदूरबार जिल्ह्य़ातील समस्त आदिवासी समूदाय यांनी मणिपूर येथील घटनेचा बुधवार या दिवशी एक दिवस कडकडीत बंद पाडून मानवतेचा व एकतेचा संदेश द्यावा.ही विनंती. आवाहन कर्ते समस्त आदिवासी समुदाय जिल्हा नंदुरबार यांनी केला आहे.