भाताला २३०० रुपये हमीभाव
खरेदी -विक्रीसाठी 28 केंद्र; शेतकऱ्यांमध्ये नाराजी
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:खरीप हंगामातील भात खरेदी लवकरच राज्य सरकारकडून सुरू होईल; परंतु शेतकऱ्यांमध्ये भाताची विक्री करण्यात फारसा उत्साह दिसत नाही. यंदा सर्वसाधारण ११७ रुपये हमीभाव वाढवण्यात आला आहे. गतवर्षी भाताला २१८३ रुपये भाव देण्यात आला होता. यंदा 2300 देण्यात आला आहे.
जिल्ह्यात २८ भात खरेदी-विक्री केंद्रांना मार्केटिंग फेडरेशन कडून परवानग्या मागवण्यात आल्या आहेत. यात आणखी आठ केंद्रांना मंजुरी मिळवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यात भात खरेदी अद्याप सुरू झालेली नाही. पिकामध्ये पाण्याची आद्रता कायम असल्याने काही दिवस पीक उन्हामध्ये सुकावे लागणार आहे. याच दरम्यान या २८ दिवसात भात खरेदी विक्री केंद्रावर ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे.
गतवर्षी असमाधानकारक पाऊस असतानाही जिल्ह्यात खरीपासाठी सहा लाख 51 हजार क्विंटल भात पिकाची विक्री शेतकऱ्यांनी केली होती. यंदा सुरुवातीपासून चांगला पाऊस पडल्याने भाताचा उतारा चांगला होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुढील पंधरा दिवसात टप्प्याटप्प्याने रायगड जिल्ह्यात 28 भात खरेदी केंद्र करण्यात येणार आहेत. या केंद्रांवर सर्वसाधारण भात 2300 किमतीला विकता येणार आहे.
*’अ ‘दर्जासाठी वाढीव वीस रुपये*
किमान आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत शासनाने या वर्षासाठी सर्वसाधारण दर्जाच्या भाताला प्रतिक्विंटल 2300 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. यात ‘अ ‘दर्जाच्या भाताच्या किमतीत साधारण वीस रुपयांचा फरक असणार आहे. तसेच यावर्षी ही राज्य शासनाकडून अतिरिक्त दिल्या जाणाऱ्या बोनसची रक्कम देखील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना भाताची विक्री शासकीय खरेदी केंद्रावर करायची आहे त्या शेतकऱ्यांची खरेदी केंद्रावर आगाऊ ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग फेडरेशन करून देण्यात आली आहे.
“उत्पादन खर्च कमीत कमी करण्यासाठी जोडणीनंतर धान घरी ना आणता तो परस्पर विकण्याचा प्रयत्न असतो. यासाठी लवकरात लवकर खरेदी केंद्र सुरू होणे आवश्यक आहे. हलवा जातीचे भात पीक तयार झालेले आहे. काही दिवसात खलाट करायची कापणी सुरू होईल यादरम्यान भाताची उचल होणे गरजेचे आहे.
-शांताराम पाटील, प्रयोगशील शेतकरी,अलिबाग
“खरेदी केंद्र सुरू करण्याचा आदेश शासनाकडून अद्याप प्राप्त झालेले आहेत. पुढील काही दिवसात जीआर निघेल त्यानुसार विक्रीसाठी पाठवलेल्या भाताचे आद्रता किती असावी, वाहतूक, विक्री पद्धत या संदर्भातील माहिती सहकारी संस्थांना देण्यात येईल. रायगड जिल्हा दरवर्षी साधारण 28 भात खरेदी केंद्र सुरू केले जातात. यावर्षी तितकेच सुरू होतील. शेतकऱ्यांना वाहतूक करणे सोयीचे होईल, अशाच मध्यवर्ती ठिकाणी असतील
– – के. टी. ताटे, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी