लातूर जिल्ह्यातील रायवाडी गावामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाने हटवला, ग्रामस्थांचा विरोध.

लातूर जिल्हा प्रतिनिधी
लातूर, दि. 25 फेब्रुवारी:- शिवजयंतीवर कोरोनाच्या नावाखाली निर्बंध घातल्यावर ठाकरे सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. कोरोनाचे सर्व नियम पाळून हि जयंती साजरा करण्यासाठी शिवभक्त तयार असतानाही केवळ 100 लोकांना कार्यक्रमस्थळी उपस्थित राहण्याची परवानगी सरकारने दिली होती. सरकारच्या या निर्णयामुळे असंख्य शिवभक्त नाराज झाले होते.
शिवजयंती जल्लोषात साजरा करता न आल्याने शिवभक्तांच्या आनंदावर विरजण पडले असताना आता आणखी एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतचा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.लातूर जिल्ह्यातील रायवाडी गावामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाने क्रेन लावून हटवला आहे. ग्रामस्थांचा विरोध असूनही प्रशासनाने हा पुतळा हटवला आहे.
पुतळ्याला परवागनीसाठी काही कागदपत्र अपुरी होती म्हणून हा पुतळा हटवला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे मात्र हा पुतळा अश्या पद्धतीने हटविण्याऐवजी तो झाकून ठेवावा असा पर्याय ग्रामस्थांनी सुचवला असताना देखील प्रशासनाने पुतळा क्रेन लावून हटवला आहे.
सोशल मिडीयावर याबाबतचे फोटोज आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबतच्या पोस्ट फिरू लागल्याने सोशल मिडीयावर अनेक शिवभक्त नाराजी व्यक्त करत आहेत.दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना कागदपत्रांसाठी अपील करा आम्ही तुम्हाला सहकार्य करू असे देखील सांगितले असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, कर्नाटक मधील एका गावातील महाराजांचा पुतळा अश्याच पद्धतीने हटविण्यात आला होता तेव्हा शिवसेनेसह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती मग आता हे सर्व पक्ष मूग गिळून का गप्प बसले आहेत असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
पुतळ्याला परवागनीसाठी काही कागदपत्र अपुरी होती म्हणून हा पुतळा हटवला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असेअसेल तर मग कितीतरी असे राजकीय नेत्यांचे पुतळे विनापरवाना आपण उभे केले असतील त्याचाही विचार आम्हाला करावा लागेल असा इशारा शिवभक्त देत आहेत.