डोंबिवली बाळ विक्री प्रकरण, डॉ. केतन सोनीच्या आश्रमात सुरु होता गोरखधंदा. अनेक मुल मिळुन आले.
✒️मुंबई महानगर प्रतिनिधी✒️
ठाणे:- मुंबईतुन एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एक लाख रुपयांमध्ये पाच दिवसाच्या बाळाची विक्री करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने एकच धक्का बसला होता. या प्रकरणी एका डॉक्टरसह आई वडिलांच्या विरोधात डोंबिवलीतील रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात जिल्हा महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने डॉक्टरांच्या आश्रमावर छापा टाकण्यात आला. यावेळी डॉ. केतन सोनी यांच्या आश्रमातून 71 मुलांची सुटका करण्यात आली.
डोंबिवलीतील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणा-या डॉ. केतन सोनी यांच्या आश्रमातून माघील अनेक दिवसा पासुन बेकायदेशीरपणे या मुलांना आश्रमात ठेवुन त्याची अवैधरित्या विक्री करण्यात येत होती. कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात एकीकडे रामनगर तर दुसरीकडे बाजारपेठ पोलिस तपास करणार आहेत. सुटका करण्यात आलेल्या सर्व मुलांना डॉक्टरने आश्रमात डांबून ठेवले होते. डॉक्टर या मुलांचं काय करत होता, याचा तपास पोलिस करणार आहेत.
डॉ. केतन सोनी यांच्या आश्रमातून मिळालेल्या मुलांची रवानगी भिवंडी आणि उल्हासनगरमधील बालसुधारगृहांमध्ये करण्यात आली आहे. सोनीच्या आश्रमात या मुलांची खाण्या-पिण्याची आबाळ होत असून प्रकृतीकडेही दुर्लक्ष केले जात आहे. यापैकी अनेक मुलांच्या अंगावर जीर्ण-फाटके कपडे होते. या मुलांबाबत कोणतीही कागदोपत्री नोंद सापडलेली नाही. त्यामुळे या मुलांचे आई-वडील कोण, हे शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
प्रकरणाचा कशा झाला भाडाफोड?
डॉक्टर केतन सोनी याने ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात राहणाऱ्या एका जोडप्याला त्यांचे नवजात बाळ विकण्यास प्रवृत्त केले. त्यांना 1 लाख रुपये देण्याची ऑफरही दिली. दाम्पत्य गरीब असल्याने ते त्यांचे मूल काही गरजू जोडप्यांना विकू शकतात, जे बाळाची चांगली काळजी घेतील, असे डॉक्टरने सुचवले होते. या जोडप्याने सुरुवातीला ही ऑफर स्वीकारली होती.
10 नोव्हेंबर रोजी महिलेने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर, ते डॉक्टरांना भेटले आणि त्यांच्या मुलाच्या मोबदल्यात 1 लाख रुपयांचा सौदा पक्का केला. या जोडप्याने डोंबिवलीतील गणपती मंदिराजवळ 15 नोव्हेंबर रोजी बाळाला डॉक्टरांकडे सुपूर्द केले आणि पैसे घेतले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
काही दिवसांनी या जोडप्याने माघार घेतली आणि डॉक्टरांना आपले मूल परत करण्यास सांगितले. मात्र डॉक्टरांच्या नकारानंतर या जोडप्याने ठाणे जिल्हा महिला आणि बालविकास विभागाशी संपर्क साधला, त्यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने राम नगर पोलिसात गुन्हा दाखल केला. जिल्हा महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकारी डॉ. पल्लवी जाधव यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी बाळाची आई-वडिलांनी पुनर्भेट घडवून आणण्यासाठी मदत केली.