नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’मधून ‘स्त्री शक्ती’चा गौरव केला. ‘एक मुलगी दहा मुलांच्या बरोबरीची असते. स्कंध पुराणातही त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे,’ असं मोदी यांनी सांगितलं.
नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पहिलीच ‘मन की बात’ होती. यावेळी मोदी म्हणाले की, ‘येत्या १ फेब्रुवारी रोजी कल्पना चावलाची पुण्यतिथी आहे. कल्पना चावला भलेही आज आपल्यात नसेल. पण तिने देशाची मान उंचावली आहे. भारतात प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर असल्याचं पाहून आनंद होतो. सर्वच क्षेत्रात स्त्री शक्ती दिसत आहे. विविध क्षेत्रात अनन्यसाधारण कामगिरी बजावणाऱ्या काही महिलांनी नुकतीच राष्ट्रपतींची भेट घेतली होती. आज महिला कुठे नाहीत? बस ड्रायव्हर महिला आहेत, महिला चालक आहेत, एवढेच नव्हे तर महिलांनी एव्हरेस्टही सर केले आहे.’