आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने नियोजन करावे -जिल्हाधिकारी किशन जावळे
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मान्सून काळात येणाऱ्या पाऊस, पूर, वीज तसेच अन्य आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे. आपत्ती काळात सर्व यंत्रणानी सतर्क व दक्ष रहावे, तसेच मान्सून पूर्व तयारी करताना सर्व बाबींची काटेकोरपणे तपासणी आणि उपाययोजना करावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.
नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक 2025 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्र.पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के,
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, सर्व शासकीय यंत्रणानी अतिधोकादायक व धोक्याची संभावना असलेल्या ठिकाणांची पाहणी करावी. या ठिकाणच्या नागरिकांना मान्सून कालावधीमध्ये सुरक्षित जागी स्थलांतरीत करता यावे यासाठी निवाऱ्याची सज्जता करावी. तसेच या काळात उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी व तहसीलदार यांनी उत्तम समन्वय राखत काम करावे. नगरपालिका, महानगरपालिकांनी नालेसफाईची कामे 31 मे पूर्वी पूर्ण करावीत. तसेच महाड शहरात दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते. अशा पूरपरिस्थितीत मदत कार्य व बचावासाठी आवश्यक पूर्वतयारी व उपाययोजना केली जावी.सर्व शासकीय यंत्रणांनी आपदा मित्रांची बैठक घेऊन नियोजन करावे. आपत्तीच्या प्रसंगी रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग आदी विभागांनी देखील नागरिकांच्या मदत व सुरक्षेच्या दृष्टीने पूर्वतयारी करावी.
सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक पूलांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती तात्काळ करावी व पर्यायी मार्ग सुस्थितीत ठेवावेत. तसेच रस्त्यावरील खडे, साईडपट्टी भरुन घेणे, रस्त्यावरील ब्लिंकर्स, बोर्ड, डायव्हर्शनचे बोर्ड, ब्लॅक स्पॉटवर रिफ्लेक्टर्स बसवावेत. सर्व विभागांकडील शोध व बचाव साहित्यांची दुरुस्ती करून सर्व साहित्य सुस्थितीत राहील, याची दक्षता घ्यावी. आवश्यक शोध व बचाव पथक, रुग्णवाहिका, स्थलांतराचे ठिकाण, अन्न पाण्याची व्यवस्था, जेसीबी मशिन्स, वूड कटर्स, बोट, लाईफ जॅकेट, स्पीड बोट, जनरेटर इ. साहित्य व मनुष्यबळ सर्व विभागांनी सज्ज ठेवावेत. पूर परिस्थितीमुळे रोगराई पसरुन साथरोगाचा धोका असतो. अशा ठिकाणी फवारणी करावी. पुरेसा औषधांचा साठा ठेवावा असे सांगितले.
दुर्घटना ठिकाणी वैद्यकीय मदत तातडीने मिळण्याच्या दृष्टीने जिल्हा शल्य चिकित्सकांशी समन्वय राखून आरोग्य विभागास काम करण्याच्या सूचना जावळे यांनी यावेळी दिल्या.
याचबरोबर अतिवृष्टीमध्ये नागरिकांनी धबधब्याच्या ठिकाणी, गडकिल्ले, धोकादायक ठिकाणी जावू नये. तसेच रायगड पाटबंधारे विभागाने धरणांची तातडीने तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अतिवृष्टी विचारात घेवून टप्प्या-टप्याने धरणांतून विसर्ग करावा अशा सूचनाही जावळे यांनी केल्या. जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, तसेच या काळात पूर्व परवानगी शिवाय कुणीही मुख्यालय सोडू नये असे निर्देश ही त्यांनी यावेळी दिले.
निवासी उपजिल्हाधिकारी शिर्के यांनी तालुकास्तरीय नियंत्रण कक्ष 24 x7 कार्यान्वित बाबत, तसेच विविध विभागांचे परिपूर्ण आपत्ती व्यवस्थापन आराखडे जिल्हा प्रशासनास पाठवण्याबाबत सांगितले. पुनर्वसन सुरू असलेल्या गावांतील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याबाबत सांगितले.
विविध विभागांच्या वतीने यावेळी आगामी मान्सून पूर्व तयारी बाबत सुरू असलेल्या कामांबद्दल माहिती देण्यात आली .मागील वर्षी घडलेल्या इर्षाळवाडी येथील दुर्घटना यासह विविध माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी केले.
या बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यासह एन डी आर एफ, होमगार्ड ,महावितरण , सार्वजनिक बांधकाम, प्रादेशिक परिवहन अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे अधिकारी यासह विविध शासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.