मित्राची सुपारी देणाऱ्याचा ही झाला गेम.
रोहा तालुका प्रतिनिधी
✍️आशीष प्रकाश कोठारी ✍️
📞7507493900📞
रोहा :- खोपोलीत गेल्या आठवड्यात (22 ऑगस्ट) एक कार सापडली होती. त्यात गोळीबाराच्या खुणा होत्या, रक्ताचे डाग होते आणि गाड़ीतील दोन मित्र इस्टेट एजंट गायब होते. त्यानंतर दोन दिवसांनी (23 ऑगस्ट) एका एजंटचा पेण-खोपोली रोडवरील गागोदी खिंडीच्या झाडीत मृतदेह सापडली होता. त्यानंतर मंगळवारी (27 ऑगस्ट) गायब असलेल्या दुसऱ्या मित्राचा मृतदेह कर्नाळा अभयारण्य परिसरात सापडला होता. या आठवडाभरात नवी मुंबई पोलिसांनी या हत्येची गूढ उकलले. आर्थिक व्यवहारातून मित्राच्या हत्येची सुपारी देणाऱ्यांने नंतर सुपारी घेणाऱ्यांसोबत आर्थिक व्यवहारावरून बिनसले आणि त्यांनी त्याचाच गेम केला. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
नक्की काय घडलं?
सुमित जैन (39) आणि अमिर खानजादा (42) हे दोघे नवी मुंबईतील नेरूळमध्ये इस्टेट एजंट होते. सुमित जैनने रायगडमधील पालीमध्ये साडेतीन एकर जमिनाचा व्यवहार केला होता. त्यात मृताच्या नावाने बोगस व्यवहार केला होता. ही बाब अमिर खानजादाला समजल्यावर त्यानेही त्यात वाटा मागितला. त्यानंतर वाटा देतानाच अमिरचा गेम करण्याचा प्लान सुमित जैनने रचला. त्यासाठी त्याने विठ्ठल नाकाडे याला 50 लाखांची सुपारी दिली. ठरल्यामुळे सुमित जैनने महत्त्वाच्या कामासाठी खोपोलीला जायचे असल्याचे अमिरला सांगितले. त्याप्रमाणे अमिर 21 ऑगस्टला गाडी घेऊन सुमितकडे आला. दोघेही रात्री खोपोलीच्या दिशेने निघाले. खोपोलीजवळ विठ्ठन नाकाडेने गोळी घालून अमिर खानजादाची हत्या केली. एवढेच नाही तर हा जीवघेणा हल्ला होता हे दाखवण्यासाठी सुमित जैनने स्वत:लाही जखमी करून घेतले होते.
त्यानंतर नाकाडेला 50 लाख रुपये देण्यावरून सुमित जैन आणि नाकाडे यांच्यात वाद झाला. सुमित जैनने 25 लाख रुपये देणार असल्याचे सांगितले. यातून सुमित जैनची हत्या करण्यात आली. सुमित जैनचा मृतदेह पेण-खोपोली मार्गावरील गागोदे खिंडीत टाकण्यात आला तर खानजादाचा मृतदेह कर्नाळा अभयारण्यात परिसरात टाकण्यात आला.
जीपीएसमुळे गाडीचा शोध
सुमित जैन आणि अमिर खानजादा परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी नेरुळ पोलिसांकडे ते हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर खानजादाच्या गाडीला जीपीएस असल्यामुळे पोलिसांनी शोध घेतला तेव्हा गाडी खोपोलीजवळ आढळून आली. त्यानंतर गाडीत गोळीबार झाल्याच्या खुणा, रक्ताचे डाग आणि दोन रिकामे काडतुसे आढळले होते.
नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. या प्रकरणी गुन्हे शाखेने बुधवारी विठ्ठल बबन नाकाडे (43), जयसिंग ऊर्फ राजा मधु मुदलीयार (38), आनंद ऊर्फ अँड्री राजन कुज (39), विरेंद्र ऊर्फ गोया भरत कदम (24) आणि अंकुश ऊर्फ अंक्या प्रकाश सीतापुरे ऊर्फ सिताफे (35) या पाच जणांना अटक केली आहे, अशी माहिती क्राइम ब्रांचचे डीसीपी अमित काळे यांनी दिली. विठ्ठल नाकाडे हा कॉन्ट्रॅक्ट किलर आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे असून यापूर्वीही त्याला अटक झाली होती. या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आठ पथके तयार केली होती. दरम्यान, या प्रकरणाचा तपास नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी करत आहेत.