मंगळवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊसा सोबत गारपीट,
पुन्हा एकदा जिल्ह्यातील शेतकरी संकटात

पुन्हा एकदा जिल्ह्यातील शेतकरी संकटात
त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
चिमूर : -जिल्ह्यात मंगळवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस झाला. या पावसाने कापसाला फटका बसला असून, गहू, तूर पिकालाही नुकसान होऊ शकते, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
मूल तालुक्यातील बेंबाळ, सावली व चिमूर तालुक्यात जवळपास अर्धा तास मेघगर्जना व वादळी वार्यासह गारपीठ झाली. बुधवारी ब्रम्हपुरी तालुक्यात तुरळक पावसाने हजेरी लावली. दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम असून, थंडवारे वाहत होते.
मागील तीन-चार दिवसापासून ढगाळ वातावरण कायम होते. मंगळवारी रात्री महानगरासह राजुरा, गोंडपिपरी, मूल, सावली, पोंभूर्णा, बल्लारपूर, वरोडा, भद्रावती, चिमूर, नागभीड, ब्रम्हपुरी, कोरपना व जिवती तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. कुठे वादळी वारा, मेघगर्जनेसह, तर कुठे तुरळक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. कपाशी उत्पादक तालुक्यात वादळी वार्यासह पाऊस बरसला. या पावसाने कापसाचे बोंड काळे पडण्याची शक्यता असून, या पिकांचे सर्वाधिक नुकसान होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
तर रब्बी हंगामातील गहू, लाखोळी या पिकालाही या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. मूल तालुक्यात झालेल्या गारपीठीने तूर, रब्बीतील गहू, हरभरा, लाखोळी यासह अन्य भाजीपाला पिकाला मोठ्या प्रमाणात तडाखा बसला आहे. या आधी खरीप हंगामातील धान उत्पादक शेतकर्यांचे अवकाळीने अतोनात नुकसान झाले. आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आता पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कापूस, गव्हाचे नुकसान होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे.