विदर्भातील युवकांनी बनविली हायटेक ‘हायड्रोजन’ कार
• चंद्रपूरातील रॅन्चोंची आमदार जोरगेवार यांनी घडवली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट
🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351
चंद्रपूर : 31 नोव्हेंबर
चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्हातील 11 युवकांनी मिळून हायड्रोजनवर चालणारी कार तयार केली केली. या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी श्री माता महाकाली महोत्सवात त्यांची कार ठेवण्यात आली होती. तर आमदार किशोर जोरगेवार यांनी या युवकांची मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही यावेळी युवकांचे कौतुक करत शासन त्यांना मदत करेल असा विश्वास दिला आहे.
यावेळी आमदार जोरगेवार यांच्या सह कारची निर्मिती करणारे हर्षन नक्षीने , साईल काकडे, प्रज्वल जमदाडे, जय विधाते, दिपक मालेकर, वैभव मांडवकर यांची उपस्थिती होती. चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्हातील वणी येथील 11 युवकांनी मिळून हायड्रोजनवर चालणारी अत्याधूनीक कार तयार केली आहे. या कारमध्ये सुरक्षा संसाधनापासून सर्व लक्झरी सुविधा उपलब्ध आहे. दोन वर्षाच्या परिश्रमा नंतर स्वखर्चातून या युवकांनी ही कार तयार केली आहे. टायर आणि काच वगळता कारसाठी वापरण्यात आलेले सर्व उपकरणे त्यांनी तयार केली असल्याची माहिती या युवकांनी दिली आहे. ही कार एक किलो हायड्रोजनवर 250 किमी चालत असल्याचा दावा या युवकांनी केला आहे. तसेच ही कार अद्यावत AI तंत्रज्ञानावर आधारित चालक विरहीत कार असल्याचेही त्यांनी सांगीतले आहे.
दरम्यान आता त्यांना ही कार रस्त्यावर उतरविण्यासाठी शासनाची मदत हवी आहे. त्यामुळे यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रयत्न सुरु केले आहे. चंद्रपूरात आयोजित श्री माता महाकाली महोत्सवातही ही कार ठेवण्याची संधी आमदार किशोर जोरगेवार यांनी या युवकांना उपलब्ध करुन दिली होती. यावेळी त्यांनी या युवकांचे कौतुक करत शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले होते. तर आता त्यांनी या युवकांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून दिली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारची पाहणी करत संपूर्ण माहिती जाणून घेतली. भारताकरिता सर्वाधिक आवश्यकता आहे अशा प्रकारचे तंत्रज्ञान या कारमध्ये वापरण्यात आले आहे. या कारमुळे प्रदुषण कमी होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले असून या कारला रस्त्यावरती आणण्यासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न केल्या जातील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.