सिद्धांत
३१ डिसेंबर २०२१: महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर हे जिल्हे गेल्या चार दशकापासून नक्षलवादी कारवायांमुळे कुप्रसिद्ध असून “नक्षलवादी विभाग” म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. भारतातील छत्तीसगढ, बिहार, मध्यप्रदेश, झारखंड राज्यात नक्षलवाद्यांचा प्रामुख्याने मोठा प्रभाव आढळून येतो. गेल्या तीन वर्षात देशभरात नक्षलवाद्यांकडून १६२ सुरक्षा दलातील जवानांची आणि ४६३ नागरिकांची हत्या करण्यात आली होती. या कालावधीत महाराष्ट्रात महाराष्ट्रात नक्षलवादी कारवायांच्या जवळपास १६० पेक्षा जास्त घटना घडल्या असून त्यात ६७ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.
महाराष्ट्राच्या सी- कमांडोनी केले नक्षलवादी अड्ड्यांवर आक्रमक हल्ले.
२०२१ वर्षात नक्षलवादी कारवायांवर रोख लावण्यासाठी पोलिसांनी आक्रमक उपाययोजना राबवल्या. जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये १५ चकमकी घडून आल्या. या दरम्यान पोलिसांनी ४९ नक्षलवाद्यांचा खात्मा केला.
ह्या वर्षी महाराष्ट्रात पाच मोठ्या नक्षलवादी विरोधी कारवाया करण्यात आल्या. १३ नोव्हेंबरला मर्दिनटोला जंगलात पोलिसांनी केलेल्या कारवाईत २७ नक्षलवाद्यांना संपवण्यात आले. गेल्या तीन वर्षातील हि सर्वात मोठी नक्षलवादी विरोधी ठरली. त्याचबरोबर २९ मार्चला खोब्रामेंढा जंगलात घडलेल्या चकमकीत ५, २८ एप्रिलला गोरगट्टा जंगलात २, १३ मेला मोरचुर जंगलात २, २१ मेला पैदि जंगलात १३ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
त्याचबरोबर या कालावधीत २० नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या आत्मसमर्पणाच्या आवाहनाला नाकारल्याने पोलिसांकडून त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्यात आली. यामध्ये महिला नक्षलवाद्यांचा देखील समावेश आहे.
गेल्या तीन दशकांपासून नक्षल चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या मिलिंद तेलतुंबडे याच्यावर महाराष्ट्र शासनाने ५० लाखांचे बक्षिसे ठेवले होते. १३ नोव्हेंबरला मर्दिनटोला जंगलात झालेल्या कारवाईत पोलिसांकडून त्याचा एन्काऊंटर करण्यात आला.