गर्दी न करता साधेपणाने साजरी करा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई,दि.6 मार्च:- 14 एप्रिल म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार सन्मानाने साजरा केली जावी. पण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जावे, असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकराची जयंती हा उत्सव आणि आनंदाचा क्षण आहे. आंबेडकरांच्या विचारांचा सन्मान म्हणून या दिवशी शिस्तीचे पालन केले जाईल, असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती कार्यक्रमाच्या नियोजनाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या व्यापक बैठकीत बोलत होते. बैठकीत जयंती समन्वय समितीच्यावतीने कोरोनाला रोखण्याच्या नियमावलीचे पालन करून 14 एप्रिल या जयंतीदिनी कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. चैत्यभूमी स्मारक तसेच मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असणाऱ्या ठिकाणी गर्दी न करता अभिवादन करा. राज्यभरातील अनुयायांनाही जयंती साजरी करण्याच्या शासन परिपत्रकातील नियमावलींचे पालन करून साधेपणाने जयंती साजरे करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.