हिंगणघाट तालुक्यात वीज पडुन दोन बैल गतप्राण.
हिंगणघाट तालुक्यातील शेकापुर बाईच्या सुकळी परीसरातील घटना.
✒️प्रा. अक्षय पेटकर, प्रतिनिधी✒️
हिंगणघाट:- तालुक्यातील शेकापुर बाईच्या सुकळी परीसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 10 एप्रिल रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसास सुरुवात झाली. यात शेकापुर (बाई ) सुकळी परीसरातील शेतात बांधून असलेल्या दोन बैलावर वीज पडल्याने बैल जोडी जागीच गतप्राण झाली. यात शेतकऱ्याचे 1 लाख 25 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
शेकापुर (बाई) येथील शेतकरी महादेव वामन अवाडकर यांनी गावातीलच रामचंद्र पांडुरंग तडस यांचे सुकळी शिवारातील शेत मक्त्याने केले आहे. मक्त्याच्या शेतात 10 एप्रिल सायंकाळी वडाच्या झाडाखाली 1 लाख 25 हजार रुपये किमतीची बैल जोडी बांधून ठेवली होती. रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळ वारा व पावसास मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली, यात बांधून असलेली बैल जोडीवर वीज पडल्याने दोन्ही बैल जागीच गतप्राण झाले. यात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती सरपंच देवीदास पाटील, माजी उपसरपंच राजू शिवणकर, कोतवाल खेकारे यांना मिळताच त्यांनी संबंधित तलाठी मंडळ अधिकारी व तहसीलदार यांना माहिती दिली. याबाबतचा अहवाल तहसीलदार यांच्याकडे पाठविला आहे. पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला. शेतकऱ्यांचे यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पुढील शेती कशी करावी असा मोठा प्रश्न महादेव अवाडकर या शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. याबाबत वडनेर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला पुढील तपास सुरू आहे.