वर्धा कोरोनाच्या काळात एका नर्सचा प्रामाणिकपणा, मृत्यक रुग्णांचा नातेवाईकांना परत केले सव्वालाख.
✒आशीष अंबादे, प्रतिनिधी✒
वर्धा,दि.19 एप्रिल:- महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरसचा प्रकोप वाढत आहे. सर्वत्र कोरोनाचा प्रभाव वाढलेला असून रुग्णालयात भरती होण्यासही अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशाही परिस्थितीत माणुसकी आणि प्रामाणिकपणा जपण्याचे उदाहरण सावंगी येथील शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या कोविड वार्डात पहावयास मिळाले.
कोरोनावरील उपचारासाठी सावंगी येथील रुग्णालयात भरती झालेले आर्वी येथील सुभाष राठी यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचे पार्थिव रुग्णालयातून हलविल्यानंतर रुग्णकक्षाची स्वच्छता करण्यास गेलेल्या वृंदा चौधरी यांना खाटेवरील उशीखाली 1 लाख 700 रुपयांसह मनगटी घड्याळ, चाव्यांचा गुच्छा आदी वस्तू आढळून आल्या. या वस्तू रुग्ण परिवाराला प्राप्त व्हाव्यात म्हणून वृंदा चौधरी यांनी लगेच रुग्णालय प्रशासनाकडे रकमेसह सोपविल्या.
एकीकडे रेमडिसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करुन मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात पाहायला मिळत आहे. मात्र, या महिला कर्मचाऱ्याने प्रामाणिकतेचा पाठ समाजाला शिकवलाय.
वृंदा चौधरी यांच्या प्रामाणिकतेची दखल घेत त्यांना दहा हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तसेच, रुग्णलायाचे अधीक्षक डॉ. संदीप श्रीवास्तव, मुख्याधिकारी डॉ. उदय मेघे, कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांनी कौतुक केले.