अदानीने केला महाराष्ट्राचा अपमान, मुंबई विमानतळावर लावले शिवाजीच्या नावा ऐवजी ‘अदानी एअरपोर्ट’ बोर्ड.

✒नीलम खरात✒
मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई:- आज काल जाणीवपूर्वक महाराष्ट्र आणि मुंबईचा अपमान केल्या जात असल्याचा बातम्या समोर येत आहे. मुंबईच्या शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर सोमवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी याच कारणाने तोडफोड केली. मुंबईच्या या एअरपोर्टचे संचालन आता अदानी ग्रुपकडे देण्यात आले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी एअरपोर्टवर लावलेल्या ‘अदानी एअरपोर्ट’च्या बोर्डची तोडफोड केली आणि तो उखडून फेकून दिला आहे.
पुर्वी हे एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट नावाने ओळखले जात होते. मात्र आता येथे अदानी एअरपोर्ट असा बोर्ड लावण्यात आला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट असे नाव हटवुन अदानी एअरपोर्ट असे करण्याचे कट कारस्थान तर केले जात नाही ना असे प्रश्न जनता विचारत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट नाव असताना ‘अदानी एअरपोर्ट’, असे नाव येथे लावण्यात आले. त्यावर प्रतिक्रिया म्हणून भारतीय कामगार सेनेने अदानी एअपोर्ट नाव काढून टाकले, असे भारतीय कामगार सेनेचे सचिव संजय कदम यांनी म्हटले आहे.
अदानी समूहाने गेल्या काही वर्षांत एव्हिएशन सेक्टरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. देशातील अनेक मोठ्या विमानतळांचे संचालन आता अदानी समूहाकडे आहे. जुलै महिन्यात मुंबईतील इंटरनॅशनल एअरपोर्टचे संचालन पूर्णपणे अदानी समूहाकडे आहे. स्वतः गौतम अदानी यांनीच ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली होती.
अदानींनी विमानतळ विकत घेतले आहे का?
छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट हे नाव केवळ महाराष्ट्र आणि मुंबईच नाही, तर संपूर्ण जगभरात ओळखले जाते. यापूर्वी येथे जीव्हीकेसारख्या मोठ्या कंपन्या होत्या. मात्र, त्यांनी असे कधीही केले नाही. विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असताना जाणूनबुजून मुंबई, महाराष्ट्र अस्थिर करण्याचे काम का करत आहात? अदानींनी विमानतळ विकत घेतले आहे का? असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.