आम्हा शेतकऱ्यांसाठी कधी उगवेल सूर्य
आम्हा शेतकऱ्यांसाठी कधी उगवेल सूर्य

आम्हा शेतकऱ्यांसाठी कधी उगवेल सूर्य

आम्हा शेतकऱ्यांसाठी कधी उगवेल सूर्य
आम्हा शेतकऱ्यांसाठी कधी उगवेल सूर्य

साहिल महाजन

यवतमाळ प्रतिनिधी 7262025028
रोज उत्पन्न वाढेल या आशेवर कोणी काय सांगतील ते प्रयोग करून अंगावर कर्ज वाढवून ठेवायचं काम शेतकऱ्या कडून चालू आहे. आज यश मिळेल उद्या नफा होईल, हे केलं तर पान रूंद होतात, ते केल तर पांढऱ्या मुळ्या सुटतात, अमुक फवारणी केली की मालाचं वजन वाढते, अमुक खते घेतली की रोपाला फुटवे चांगले निघतात. सगळे शेतकऱ्याची फसवणूक करून पैसे कमावणारेच. रास्त भाव, हमी भाव, एम एस पी, स्वामीनाथन, ही मागणी केली की योग्य दर मिळेल, तो आयोग लागू झाला पाहिजे मग नफा दिडपट मिळेल. असे ऐकून ऐकून दर वर्षी अनुभव घेत घेत फक्त कर्ज वाढत गेलं.

खरच किती वर्षे हे प्रयोग करत जगायचे?
एक एक प्रयोग फेल गेला कि नशीबाला दोष देत एक एक वावर कधी विकलं कळालं नाही. कर्ज काढून पाण्यासाठी पाईपलाईन केली, घरच औत असलं तर पिकातील मशागत चांगली होते म्हणून चांगली बैलं घेतली, खोल नांगरणी करण्यासाठी ट्रॅक्टर घेतला, शेणखता गायी पोसल्या, शेतीला जोडधंदा असावा म्हणून कोंबड्या शेळ्या, कर्ज काढून घेतली. कुणी सांगीतलं शेतात शेततळे घ्या , कुणी सांगीतलं ड्रिप करा, सीताफळ लावा, केळी लावा, डाळिंब लावा, पपई लावा, वांगी लावा, सगळे उद्योग थांबले. फक्त वाढल ते कर्ज. सरकार कडून मिळालेली सवलत फसवी, दररोज चारा घालून वाढवलेल्या बोकडावर जसं कापण्यासाठी अंगावर मांस वाढण्याची वाट पाहात सांभाळले जाते. तसे शेतकऱ्या कडे बघण्याची सगळ्यांची दृष्टी आहे. खतवाला, औषधवाला, बँकवाला, सावकार, आडत्या, शेत माल खरेदीदार, दुध संघ, सगळे शेतकऱ्याची कापायला येण्या पुरतीच मदत करतांना दिसतात.

शेतकरी मोठा व्हावा ही कोणाचीच इच्छा नाही.
बोकड जसं मालकाची आपल्यावर मर्जी आहे असे वाटून उड्या मारत जगत असते, आणि शेवटी कळतं यानं आपल्याला का सांभाळले. तसे वेळ गेल्यावर कळतं शेतकऱ्याला की उत्पादन वाढवायला सरकारने का सांगीतले ते. वर्षातून तीन तीन पीक घेऊन, जमिनीला पाणी पाजून पाजून, खतं घालून घालून शेती नापीक होते तरीही प्रयोग थांबत नाही. ज्याला त्याला विचारलं तर म्हणतय घरची शेती आहे, पडीक ठेवायची काय? आणि रात्र दिवस मेहनत करून उत्पन्न डब्बल करायच्या नादात कर्ज डब्बल कधी होते खरंच कळत नाही. रोज होणाऱ्या शेतकरी आत्महत्या आमचं मन सुन्न करीत नाही हे खरं आहे, शेतकरी रोज त्याच मातीत गाडल्या जातो पण यावर कुणीही बोलायला तयार नाही.

शेती ही संस्कृती आहे असे ऐकून ऐकून कान पिकले आहेत आम्हा शेतकऱ्यांचे.
बापाच्या छातीवर हात ठेवून झोपणाऱ्या मुलांना विचारा एकदा की तू का ठेवतो छातीवर हात? तेव्हा त्याचं उत्तर येते की बाप जिवंत आहे का हे तपासून घ्यावे म्हणून ठेवावा लागतो हात. भयाण आहे हे सर्व. आमच्या शेतीची पार वाट लावून टाकली इथल्या राजकीय सत्तेने. शेतीवर कविता करणारे छान जगतात. शेतीवर कादंबरी लिहिणारे खुशाल जगतात. शेतकरी आत्महत्या वर पुस्तक लिहिणारे सुद्धा मजेतच असतात. शेती कशी करावी हे सांगणारे तर अधिकच मजेत आहेत. प्रत्यक्ष शेतीत राबणारा जीव मात्र कासाविस होतो आहे. आम्हा शेतकऱ्यांना आमच्या प्रश्नांचे उत्तर शोधू दिले जात नाही, संभ्रम निर्माण करून आमचा एक प्रकारे घात केल्या जातो तरीही येणारे वर्ष आम्हा शेतकऱ्यासाठी चांगले येईल या आशेवर आम्ही जिवंत आहो एवढंच…..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here