२०१५ आणि २०१८ साली महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार प्राप्त होता. ह्यावर्षीचा पुरस्कार महाराष्ट्राला प्राप्त होईल का?
सिद्धांत
२६ जानेवारी २०२२: दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजधानी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनात देशभरातील राज्ये आपल्या राज्यातील कलांचे, संस्कृतीचे दर्शन घडविणारे चित्ररथ सादर करतात. ह्या वर्षीच्या संचलनामध्ये महाराष्ट्रातर्फे ‘महाराष्ट्रातील जैवविविधता’ या विषयावर आधारित दिमाखदार चित्ररथ सादर करण्यात आला होता.
ह्या चित्ररथामध्ये जवळपास १५ फुटांचे आंब्याचे झाड सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’, महाराष्ट्राचे राज्यफूल ‘ताम्हण’ आणि महाराष्ट्राचा राज्यपक्षी ‘हरियाल’ यांच्या सुंदर प्रतिकृती उभारण्यात आल्या होत्या.तसेच चित्ररथामध्ये वाघ,मोर, बगळा यांसारख्या प्राण्यांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या होत्या.
चित्ररथाच्या अग्रस्थानी सातारा जिह्यातील कास पठाराच्या प्रतिकृतीला स्थान देण्यात आले होते. त्याच्याच बाजूला महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ‘ब्लु मॉरमॉन’ ची प्रतिकृती चित्ररथाची शोभा वाढवत होती.
दरवर्षी विविध राज्यांमार्फत चित्ररथाचे सादरीकरण झाल्यानंतर प्रशासनातर्फे सर्वोत्कृष्ट चित्ररथांना पारितोषिक दिले जातात. त्यासाठी चित्ररथाचा विषय, त्याची कलात्मक मांडणी, त्यासाठी वापरलेले तंत्रज्ञान यांसारख्या बाबींचा विचार केला जातो. गेल्या काही वर्षात २०१५ आणि २०१८ साली महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ह्यावर्षीचा पुरस्कार कोणास प्राप्त होईल याबाबत जनतेमध्ये उत्सुकता आहे.