घर गहाण ठेवून घेतले कर्ज, पण धनादेश न वटल्याने शेतकऱ्याची आत्महत्या.

 यवतमाळ :- पांढरकवडा फायनान्स कंपनीकडे शेतकऱ्याने आपले राहते घर गहाण ठेवून कर्ज घेतले. मात्र, कंपनीच्या वतीने दिलेला धनादेश बँकेत दोनवेळा वटला नाही. कोरोनाची पार्श्वभूमी आणि परिस्थितीशी संघर्ष करीत असलेल्या तरुण शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली. उपचारादरम्यान शनिवारी  शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्‍यातील जिरा (मीरा) येथे घडली.

श्‍यामसुंदर शंकर टेकाम वय 40 असे मृताचे नाव आहे. वडील शंकर टेकाम यांच्या नावाने तीन एकर शेती असून पत्नीच्या नावे नऊ अशी 12 एकर शेती त्यांच्याकडे आहे. आईवडील वयोवृद्ध असल्यामुळे श्‍यामसुंदर हाच शेतात राबायचा. शासनाच्या वतीने सन 2016 मध्ये झालेल्या कर्जमाफीचा लाभदेखील त्यांच्या कुटुंबाला मिळाला नव्हता. श्‍यामसुंदर यांनी यवतमाळ येथील एका खासगी फायनान्स कंपनीकडे घर गहाण ठेवून कर्ज मंजूर करून घेतले. कंपनीच्या वतीने त्यावेळी एक लाख रुपयांचा धनादेश शेतकऱ्यास देण्यात आला होता.

कंपनीने दिलेला धनादेश बँकेत वटला नाही. दुसरा धनादेश देखील वटत नसल्याने चिंतातूर शेतकरी सतत फायनान्स कंपनीचे उंबरठे झिजवत होता. यामध्ये आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच शामसुंदरने बुधवारी  सायंकाळी शेतात कीटकनाशक पिऊन घरी पोहोचला. थोड्यात वेळात त्याला उलटी होत असल्यामुळे त्याला करंजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंतानजक असल्याने उमरी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान शनिवारी त्याचा मृत्यू झाला. फायनान्स कंपनीने दिलेला धनादेश वटत नसल्याने मुलाने आत्महत्या केल्याची संतप्त प्रतिक्रिया वडिलांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here