पुरेश्या पावसाशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये
कृषी विभागाचे शेतकर्यांना आवाहन
🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर ब्युरो चीफ
📱 8830857351
चंद्रपूर : 27 जून : – वातावरणातील बदलामुळे मान्सूनचे जिल्ह्यातील आगमन उशिराने झाले असले, तरीही शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करु नये, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. कृषी व हवामान सल्ल्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 26 ते 28 जूनपर्यंत आकाश ढगाळ राहून सर्वत्र ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात चालू 2023-24 या खरीप हंगामात 4 लाख 90 हजार हेक्टरवर खरीप पिकांचे नियोजन केले आहे. यात प्रत्येकी 1 लाख 87 हजार हेक्टर भात पिक व कापूस तर 80 हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाचा पेरा राहील. हवामान विभागाच्या या अंदाजानुसार 24 व 25 जूननंतर अरबी समुद्रावरून येणार्या नैऋत्य मोसमी वार्यांना गती मिळण्याची शक्यता असल्याने सर्वदूर चांगला पाऊस पडण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. यासंदर्भात शेतकर्यांना आवाहन करण्यात येत आहे.
शेतकर्यांनी पेरणीसाठी घाई करु नये, सर्वसामान्यतः शेतकर्यांनी 80 ते 100 मिमी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये. शासनाकडून महावेध प्रणालीमार्फत जिल्ह्यासाठी प्राप्त दैनिक पर्जन्यमान अहवालानुसार वरोरा तालुक्यातील टेमुर्डा, खांबाडा, चिमूर तालुक्यातील खडसंगी, भिसी, मासळ, राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन व कोरपना तालुक्यातील कोरपना व गडचांदूर याच महसूल मंडळामध्ये 75 ते 100 मिमीपर्यंत पर्जन्यमान झाल्याची नोंद असली, तरी सलग तीन दिवस पर्जन्यमान झालेले नाही. त्यामुळे या व इतर महसूल मंडळांतर्गत असलेल्या शेतकर्यांनी पुरेसा पाऊस पडल्याची खात्री करुनच पेरणी करावी. उन्हामुळे तप्त झालेल्या शेतजमिनीतील ओलावा घटतो. त्यामुळे पावसाळ्यात किमान 75 ते 100 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाल्यानंतरच किंवा जमिन किमान सहा इंच ओली झाल्याची खात्री झाल्यानंतरच शेतकर्यांनी पेरणी करावी. जिल्ह्यात जून महिन्याच्या 183.5 मिमी सरासरी पैकी 26 जूनपर्यंत 42.8 मिमी पर्जन्यमान झाले असून, त्याची टक्केवारी 23.10 आहे. मागील वर्षात याच तारखेपर्यंत 78 मिमी पाऊस पडला होता.