G20 Summit ची जबाबदारी पेलण्यात पंतप्रधान मोदी पूर्णतः अपयशी? कुठला विश्वगुरू अन् कसला विश्वगुरू? प्रकाश आंबेडकरांचा सवाल…
मीडिया वार्ता न्यूज
मुंबई, ८ सप्टेंबर: गरिबांना लपवणे, G20 Summit साठी भरमसाठ पैसे खर्च करणे, सहभागी देशांना एकत्र आणण्यात अपयश यांसारख्या मुद्द्यांवर जबाबदारी पेलण्यात पंतप्रधान मोदी पूर्णतः अपयशी ठरले असल्याचे अनेकांकडून बोलले जात आहे. त्यात प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आयोजनातील असलेल्या त्रुटींबद्दल थेट सवाल केले आहेत.
सोशल मीडियावर पोस्टमध्ये प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या G20 Summit मधील भूमिकेबद्दल महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. ते म्हणतात, स्वतःला विश्वगुरूचं लेबल चिकटवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझे काही प्रश्न आहेत.
दरम्यान ९ – १० सप्टेंबर २०२३ दरम्यान दिल्लीत होणाऱ्या G20 Summit च्या तयारीसाठी मोदी प्रशासनाने गरिबांची घरे उध्वस्त केल्याची टीका केली जात आहे. शहर स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या नावाखाली दिल्लीतील तब्बल ३००० हजार घरांना घर खाली करण्याची नोटीस देण्यात तर १६०० वास्तु तोडण्यात आल्या. यामुळे तब्बल ५० हजार नागरिकांना जबरदस्तीने स्थलांतर किंवा आपल्या घराविना राहावे लागले. हा आकडा कदाचित २.५ लाख लोकांपर्यंत असू शकतो, अशी आकडेवारी लॅन्ड कॉन्फ्लिक्ट वॉच नावाच्या एका संशोधन स्थाने जाहीर केले आहे.
याचबरोबर दिल्लीतील अनेक झोपडपट्ट्या, वस्त्यां हिरवे कापड, बॅनर्स लावून G20 Summit साठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांपासून लपवून ठेवत असल्याचा आरोपही मोदी प्रशासनावर केला जात आहे.