मॅरेज ब्युरोच्या नावाखाली सुरू होता अल्पवयीन मुलींना विकण्याचा धंदा.
रायपूर:- देशात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्या आहेत. पोलिसांनी नुकताच एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याठिकाणी मॅरेज ब्युरोच्या नावाखाली अल्पवयीन मुलींना विकण्याचा धंदा सुरू होता. या प्रकरणी कारवाई करताना पोलिसांनी एका महिलेसोबतच सात जणांना अटक केली आहे.
ही महिला मॅरेज ब्युरो चालवण्याचं काम करत होती. या दलालांच्या तावडीतून दोन मुलींची सुटका करण्यात पोलिसांना यश आलं आहे. छत्तीसगड राज्यातील रायपूरमध्ये मानव तस्करी करणाऱ्या रॅकेटच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मॅरेज ब्युरोच्या नावाखाली हा मानवी तस्करीचा धंदा सुरू होता. संबंधित मॅरेज ब्युरोने दोन अल्पवयीन मुलींना मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्यातील एका ग्राहकाला विकल्या होत्या. याठिकाणी विकल्यानंतर त्या मुलींना या दलालांच्या जाळ्यातून मुक्त करण्यात आलं आहे.
छत्तीसगड राज्याच्या कोंडागाव परिसरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुली 26 नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाल्या होत्या. या मुलींना शोधण्यासाठी पोलिसांनी खुप प्रयत्न केले. पण त्यांना या बेपत्ता मुली सापडल्या नाही. जेव्हा या मुलींचा सुगावा लागला, तोपर्यंत यांची लग्न झाली होती. संबंधित मॅरेज ब्युरोने त्यांच्या आधारकार्डवर त्यांचं वय वाढवून लावलं होतं. या मुलींचा प्रत्येक अडीच लाख रुपयांमध्ये सौदा झाल्याचं उघड झालं आहे.
पोलिसांनी या प्रकरणांत आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. ज्यामध्ये एक महिलाही सामील आहे. ही माहिलाच संबंधित मॅरेज ब्युरो चालवत होती. पोलिसांनी याप्रकरणांत पीडित मुलींचा जाब नोंदवून घेतला आहे. मुली विकत घेतलेल्या काही लोकांचे मोबाइल नंबर पोलिसांच्या हाती लागले आहेत. आता या मुलींना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपावण्यात आलं असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.