केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात ‘चिखलफेको’ आंदोलन
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 21 जून
नीट परीक्षेतील घोळ व नेटचे पेपर फुटीचे प्रकरण तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवार, 21 जून रोजी येथील गांधी चौक येथे ‘चिखल फेको आंदोलन’ करण्यात आले. यावेळी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चिखल फासण्यात आले.
यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार अभिजित वंजारी, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, विनोद दत्तात्रेय, सुभाषसिंग गौर, के. के. सिंग, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष चंदा वैरागडे, घनश्याम मुलचंदानी आदी उपस्थित होते.
यावेळी खा. धानोरकर यांनी, मागील 10 वर्षापासून सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खिळ घातली आहे. राज्यातील मोठे उद्योग गुजरातला पाठवले आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही औद्योगिक विकास पाहिजे तसा झाला नाही. उलट बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप केला. आ. धोटे यांनी, स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत. या परीक्षा घेतल्या तर पेपरफुटीचे ग्रहण लागले. निट परिक्षेच्या पेपरफुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले आहे, असाही आरोप करण्यात आला. सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत सरकार चालढकल करत असल्याने बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. महिला, मुलींचे दिवसाढवळया रस्त्यावर खून पाडले जात आहेत. राज्यातील शेतकरी भयंकर संकटात आहेत पण त्यांना मदत दिली जात नाही, असाही आरोप यावेळी उपस्थित पदाधिकार्यांनी केला.