आधी आमची नुकसान भरपाई द्या नंतर लॉकडाऊन लावा. अन्यथा आम्ही शहरातील सर्व मार्केट उघडू, शेतकरी नेत्यांचा इशारा.
अमरावती :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच प्रादुर्भाव वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात 7 दिवस संचारबंदी वाढवलीय. अमरावती, अचलपूर ,अंजनगाव सूर्जी शहर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेत. या तिन्ही शहरात 8 मार्चपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ तशीच राहणार आहे. तसेच नंतरची स्थिती पाहून पुढील निर्णय घेणार असल्याचंही प्रशासनानं सांगितलंय. मात्र, अकोला आणि अमरावतीमध्ये जे लॉकडाऊन लावण्यात आलं आहे ते नियमाप्रमाणे लावण्यात आलेल नाही, असा आरोप शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी केला आहे.
अकोला आणि अमरावतीमध्ये जे लॉकडाऊन नियमाप्रमाणे नाही
अमरावतीमध्ये जे लॉकडाऊन लावण्यात आलं आहे ते नियमा प्रमाणे लावण्यात आलेल नाही. बाकी देशात लॉकडाऊन लावण्याआधी लोकांना मदत केल्या जाते. आधी आमची नुकसान भरपाई द्या नंतर लॉकडाऊन लावा. अन्यथा आम्ही अमरावती शहरातील सर्व मार्केट उघडू. प्रशासनाला जी कारवाई करायची ते करु द्या’, असा इशारा शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी अमरावती येथील पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी शहरातील सर्व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा उपस्थित होते. ‘लोकांच्या प्रश्नापासून तोंड लपवण्यासाठी आणि अधिवेषणावर येणाऱ्या लोकांच्या मोर्चापासून वाचण्यासाठी हे सरकार कोरोनाला समोर करुन लॉकडाऊन लावत आहे. त्यामुळे कोरोना कसा नौटंकी आहे, हे आम्ही सिद्ध करू शकतो. त्यामुळे आजपासून सर्व व्यापाऱ्यांनी आपलं मार्केट उघडा, जे काही गुन्हे दाखल करायचे आहे, ते प्रकाश पोहरेवर दाखल करा. मी कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार आहे’, असेही यावेळी प्रकाश पोहरे यांनी सांगितले.
दरम्यान, ‘कोरोना काही नाही, मला कोरोना नाही होत’, असे म्हणत शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी अमरावतीच्या सुप्पर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटीव्ह वॉर्डमध्ये विनामास्क जाण्याचा मार्ग केला. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. तर अमरावतीत आजपासून शहरातील दुकान उघडण्याचे आवाहन करण्यात आल्याने, याला आज कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.