क्षयरुग्णांची माहिती न दिल्यास खाजगी डॉक्टरांवर फौजदारी गुन्हा.
वसई विरार शहर क्षयरोग कार्यालय, वैद्यकीय आरोग्य विभाग त्याची माहिती.
राकेश जाधव प्रतिनिधी
वसई विरार:- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या अधिसूचनेनुसार प्रत्येक क्षयरुग्णाची नोंद होऊन त्यांच्यावर उपचार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णास क्षयरोगाची लक्षणे दिसल्यास त्याची माहिती आरोग्य विभागास कळविणे बंधनकारक आहे. अन्यथा क्षयरुग्णांची माहिती न देणाऱ्या खाजगी डॉक्टरांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.
क्षयरोगाच्या वाढत्या प्रचारास आळा घालण्यासाठी उपाययोजना म्हणून निदान झालेल्या प्रत्येक क्षयरुग्णाची आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. क्षयरोग निदान करणाऱ्या सर्व पॅथोलोजी, मायक्रोबायोलॉजी, प्रयोगशाळा, क्षयरोगाची औषधे विकणारे सर्व औषध विक्रेते यांना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करावी लागणार आहे. जे क्षयरुग्णांच्या माहितीची नोंद करणार नाहीत त्यांच्या विरोधात क्षयरोग प्रसारास मदत केल्याचा आरोप लावून भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम २६९ व कलम २७० अन्वये गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
1 जानेवारी 2021 पासून क्षयरोग निदान व उपचारासंबंधी नव्या कायद्याची कडक अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे क्षयरोग निदान करणाऱ्या सर्व पॅथोलोजी, मायक्रोबायोलॉजी, प्रयोगशाळा, रेडीओलॉजी, डॉक्टर व औषध विक्रेत्यांना क्षयरोग रुग्णांची माहिती कळविणे अनिवार्य आहे. नव्याने आढळणारे रुग्ण व औषधे घेणाऱ्याची माहिती संबंधितांनी जवळचे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा पी.पी.एम.समन्वयक यांना प्रति महिना कळविण्यात यावी हे बंधनकारक आहे.