वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम, कर्मचा-यांवर हल्ला, यवतमाळ जिल्ह्यातील घटना.
वीज बिल वसुलीसाठी कनेक्शन तोडण्याची कारवाई महावितरणकडून केली जात आहे. थकबाकीची रक्कम टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत देऊन कंपनीने महामारीने त्रस्त असलेल्या जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा संघर्ष अटळ आहे
✒ साहिल महाजन, यवतमाळ जिल्हा प्रतीनिधी ✒
यवतमाळ :- ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत घोषणा करून सर्वसामान्यांना वीज बिलांवर कोणताही दिलासा न दिल्याचे स्पष्ट संकेत दिल्यानंतर वीज बिल वसुलीला गती मिळाली. यवतमाळ जिल्ह्यात वीज बिल न भरणाऱ्याची वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम विद्युत मंडळाने सुरु केली आहे. यामुळे नागरिकांत तीव्र असंतोष आहे. अशातच जिल्ह्यातील पुसद तालुक्याच्या शेंबाळपिंपरी येथे वीज कनेक्शन कापायला गेलेल्या कर्मचाऱयांवर संतप्त ग्राहकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.
कर्मचा-यांना मारहाण प्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही विद्युत मंडळाचे कर्मचारी अरुण पेंदे यांच्याकडे थकबाकी असल्याने त्यांच्या दुकानात जाऊन त्यास सदर दुकानातील बिल भरणे बाबत विनंती केली असता अरुण यांनी वादावादी करून मारहाण केली. वीज बीलांमध्ये कोणतीही सवलत न मिळाल्याने नागरिकात आधीच असंतोष आहे. यामुळे भविष्यातही अश्या मारहाणीच्या घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.
सध्या शहरी भागासह ग्रामीण भागातील बहुतांश कामे ही वीजेवर चालतात. कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात वीज कंपनीने वीजबिलांचे सुद्धा वाटप केले नव्हते. तीन-चार महिन्यांची बिले एकत्रितपणे कालांतराने दिल्याने ती भरताना कौटुंबिक आर्थिक नियोजन ढासळले. एकत्रित वीज बिल दिल्याने एकूण युनिट वाढले आणि युनिट दर जास्त लागला. यामध्ये वीज ग्राहकांचे दुहेरी नुकसान झाले आहे. या परिस्थितीत थकित वीज बिल टप्प्याटप्प्याने भरण्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात यावा किंवा धोरणात्मक निर्णय मंडळाने घ्यावा