बैलपोळ्याचा सण आला पण माझं काय…?
सणापाठोपाठ सण येतात अन् जातात कोणी आनंदाने सण साजरे करतात पण, माझ्या जीवनात मात्र बाराही महिने संकटे वरचेवर येत असतात अहो, ओळखले का मजला मी बळीराजा बोलतोय मला जगाचा पोशिंदा म्हणतात पण,मी राजा तरी कसला…? दरवर्षीच्या नापिकीमुळे, दुष्काळामुळे, निसर्गाच्या कोपामुळे, वनप्राण्यांच्या हैदोसामुळे सोबतच शासनाची माझ्याकडे लक्ष नसल्यामुळे आज मी एक,एक सेंकदाला जीवंतपणी मरत आहे. मग आपणच सांगा मी कोणाला न्याय मागायला जावू…? एकीकडे निसर्ग कोपत आहे तर दुसरीकडे बहरलेल्या पीकात वनप्राण्यांचा कडप तांडव करत आहेत हिरवेगार पिकाचा मातीमोल करत आहेत माझ्या पिकाची अवस्था पाहून डोळ्याला, डोळा लागत नाही. कारण आज माझ्या पिकाची अवस्था या प्रकारची झाली आहे की, मी वर्षभर काय खाणार…? माझ्या कुटूंबाचे पालनपोषण कसे करणार. ..?
आज बैलपोळ्याचा सण वर्षातून एकदा आला खरं पण माझ्या सर्जा राजाला मी सजवू तरी कसा..? कारण, पहिले सारखे आता दिवस राहिले नाही ह्मा महागाईच्या तडाख्यापायी माझ्या सर्जाला सुद्धा कमी भावात विकून टाकावे लागले आणि आजच्या दिवशी त्याची मला खूप आठवण येत आहे सर्जाचे व बळीराजाचे नाते किती घट्ट असतात कसे कळणार तुम्हाला. …? पण मला सर्व कळते काय करू मी माझा जीव त्याच्यासाठी तुटतो आहे .माझ्या सर्जासाठी आजचा दिवस होता पण तो माझ्या घरी नाही त्याच्याविना माझा अंगण, गोठा, घर सुना पडला आहे.त्याच्या शिवाय मला करमत नाही कारण तो माझ्या मुलासारखा होता.त्याचे ऋण माझ्यावर आहेत पण काय करू नाईलाजाने त्याला विकावे लागले अनेकदा हा पाऊस असा पडतो की तोडांवरचा घास हिसकावून घेऊन जातो. अन् जेव्हा गरज असते तेव्हा, बेईमानी करतो मग मला आधार तरी कोणाचा आहे. ..? क्षणाक्षणाला मी मरत असतो तर जगणार तरी कसा …? मी जगाचा पोशिंदा आहे काय पदवी मिळाली आहे मला व्वा, व्वा कदाचित माझा अंत बघण्यासाठी दिली असावी म्हणून तर माझ्याकडे पूर्णपणे सर्वानी मिळून पाठ फिरवली आहे. नकळताच मला सर्व काही कळत आहे.
गेल्या दोन महिन्यापूर्वी टोमॅटोचे भाव का वाढले होते न बोलणारे सुद्धा बोलायला लागले होते पण,आज मी संकटाच आहे तर मात्र सर्वजण मुके,बहिरे, आंधळे, अज्ञानी झाले आहेत हे असे, कसे होऊ शकते…? म्हणजे कदाचित मी नकोसा वाटत असेन म्हणून तर माझा कोणीही विचार करत नाही. मी कोणकोणत्या संकटांविषयी बोलणार विजेच्या वाढत्या बिलाविषयी की,माझ्या मालात भाववाढ होत नाही या विषयी बोलणार तरी कसा माझे बोलणे कोणी ऐकून घेतील तेव्हा नं असो,मी जगलो तर काय आणि मेलो तर काय कोणालाही फरक पडत नाही पण,माझ्या कुटूंबाला मात्र अफाट संघर्ष करावा लागतो हे शंभर टक्के खरे आहे. कोणी तुपाशी आहे तर माझ्या सारखे असे कित्येक बांधव संकटाला तोंड देऊन जगत आहेत आज बैलपोळ्याचा सण आहे खरा पण,माझ्या डोळ्यात मात्र अश्रू आहेत कारण हे अश्रू वाहतच राहणार आहेत पुसणारे कदाचित जन्माला यायचे असणार मी कितीही टाहो फोडून रडत बसलो तरी फायदा होणार नाही म्हणून आता असं वाटते की, मी जगावे की,मरावे…? जगाला पोसण्या पुरता मी उरलो आहे बाकी, मज्जा मात्र दुसरेच करतात जर माझ्याकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे थोडासा वेळ राहिला असता तर आज मला असे म्हणावे लागलेच नसते पण वारंवार म्हणावे लागते हि फार मोठी शोकांतिका आहे.
काही गोष्टीची एक मर्यादा असते पण,यांनी तर सर्वच मर्यादा पार केलेली आहे आपल्या राजकारणात मस्तपैकी दंग होऊन या पोशिंद्याला सुद्धा विसरून गेले आहेत हे,नाकारता येत नाही. म्हणून मी माझ्या शेतकरी बांधवाना म्हणू इच्छितो की, शेतकऱ्यावर वारंवार होत असलेला अन्याय सहन करण्याऐवजी एकत्र येऊन लढले पाहिजे व आपली एकता जगाला दाखवून दिली पाहिजे बळीराजा कोणाचा नौकर, चाकर नाही तर जगाचा पोशिंदा आहे. तेव्हाच या जगात जगता येईल एक दिवस आपलाही येईल. तरीही का होईना बैलपोळ्याच्या सर्वाना शुभेच्छा देतो जरी तुम्ही विसरले असणार तरी मी मात्र कोणालाही विसरत नाही.
सौ.संगीता संतोष ठलाल
मु.कुरखेडा जि.गडचिरोली
७८२१८१६४८५