कांदा घोटाळा प्रकरणी घोटाळेबाजांचे धाबे दणाणले, चौकशी समिती गठीत, कोट्यावधीचा घोटाळा झाल्याचा संशय

अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351
वरोरा,14 सप्टेंबर: तालुक्यातील शेतकर्यांनी कांद्याचे पीक न घेताच त्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाल्याचा गंभीर प्रकार नुकताच उघडकीस आला. आता जमा झालेली रक्कम काही व्यापार्यांनी शेतकर्यांकडून परत मागण्याचा तगादा लावल्याने 2 कोटी 30 लाख 73 हजार रुपयाच्या कांदा घोटाळा समोर आला आहे. आता या प्रकरणाची चौकशी समिती लागल्याने सबंधितांचे धाबे दणाणले आहे.
1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 पर्यंत वरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 65 हजार क्विंटल कांद्याची खरेदी केली गेली. विशेषतः या क्षेत्रात यापूर्वी कधीही कांद्याची लागवड इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्याची नोंद नाही. रब्बी हंगामानंतर कांदा पिकवण्यासाठी सिंचनाची सोय नसल्यामुळे शेतकरी कांदा लागवड फार प्रमाणात करीत नाही. याच दरम्यान कांद्याचे भाव घसरल्याने आणि अवकाळी पावसामुळे शेतकर्याचे नुकसान झाल्याने महाराष्ट्र शासनाने प्रतिक्विंटल 350 रुपये एवढे अनुदान कांदा उत्पादक शेतकर्यांना जाहीर केले आणि नुकतेच ते अनुदान शेतकर्यांच्या खात्यात जमा झाले.
मात्र, वरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीने ज्या शेतकर्यांच्या शेतामध्ये सिंचनाची व्यवस्था नाही तसेच ज्यांच्या पीक पेर्यावर कांदा लागवडीची नोंद नाही अशा शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. आता बाजार समितीमध्ये परवानाधारक व्यापारी तसेच इतर सबंधित लोक लाभार्थी शेतकर्यांकडे जाऊन जमा झालेल्या पैशांमधील वाटा मागू लागले आहेत. विशेष म्हणजे, हे अनुदान लाल कांद्याकरिता आले होते आणि या भागात लाल कांद्याची उत्पादन घेतले जात नाही. तसेच कृषी विभागाच्या अहवालाची वाट न बघता हा प्रकार घडला असल्याचे निदर्शनास आले आहे.
या संदर्भात आ. प्रतिभा धानोरकर यांनी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. गुरुवारला पणन संचालकांनी जिल्हा उप निबंधक, चंद्रपूर यांना पत्र पाठवून या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागितला आहे.









