रविवार बाजारात पाणीपुरी व नुडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलीचा मृत्यू.
गावातील 30 ते 40 लोकांना विषबाधा झाल्याची शक्यता
✒मनोज खोब्रागडे✒
भंडारा:- भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील भेंडाळा गावात विषबाधेमुळे 12 वर्षीय मुलीचा मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर गावातील गावात 30 ते 40 लोकांना विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्ञानेश्वरी रामदास सतीबावणे असे त्या मृत मुलीचे नाव असून रविवारी बाजारामध्ये नूडल्स खाल्याने उलट्या आणि हगवण सुरू झाली होती त्यामुळेच मृत्यू झाल्याचे ज्ञानेश्वरीच्या कुटुंबियांनी सांगितले आहे. विषबाधा झालेल्या लोकांना उपचारासाठी पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
• चायनीज आणि पाणीपूरी खाल्ली :
भेंडाळा या गावात रविवारी आठवडी बाजार होता. आठवडी बाजारमध्ये गुपचूप आणि चायनीजचे ठेले लागले होते. पाणीपूरी आणि नूडल्स खाल्लेल्या सर्व लोकांना सोमवारी त्याचा त्रास जाणवू लागला. रामदास सती बावने यांच्या कुटुंबातील मुलांनीसुद्धा हे नूडल्स खाल्ले होते. त्यानंतर सोमवारपासून या मुलांना उलट्या आणि संडासचा त्रास सुरू झाला. त्यामुळे या मुलांनी सोमवारपासून काहीही खाल्ले नव्हते. त्यातच मंगळवारी ज्ञानेश्वरीची प्रकृती जास्त झाल्याने तिच्या वडिलांनी तिला उपचारासाठी पवनी येथे नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर विषबाधा झाल्याचे समोर आले.
• आरोग्य यंत्रणा सतर्क :
ज्ञानेश्वरीच्या मृत्यूची बातमी गावात पसरल्या नंतर हळूहळू गावातील बरेच लोकांना सध्या उलटी आणि हागणीचा त्रास सुरू झाल्याचे माहिती झाले. अशा लोकांवर घरी किंवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, नेमक्या किती लोकांना याचा त्रास होतो आहे हे सध्यातरी स्पष्ट झालेले नाही. ज्ञानेश्वरीच्या मृत्यूची बातमी आरोग्य यंत्रणेला मिळताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी होत गावात पोहोचली आहे. प्रत्येक घरातील व्यक्तींची तपासणी करून माहिती गोळा करीत आहेत. तसेच उपचाराची गरज असणाऱ्या सर्वांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जात आहे. विषबाधा नेमकी कशाने झाली याचा शोध आरोग्य यंत्रणा घेत आहे.