Home latest News पत्रकारिता देश व समाज घडविण्याचे मोठे माध्यम

पत्रकारिता देश व समाज घडविण्याचे मोठे माध्यम

69

पत्रकारिता देश व समाज घडविण्याचे मोठे माध्यम

रमेश कृष्णराव लांजेवार

मो.नं.9921690779

नागपूर: आज भारतातच नाही तर संपूर्ण जगात पत्रकारितेला मोठे महत्व आहे. त्यामुळे पत्रकारितेला चौथा स्तंभ ही उपमा दिली आहे.जागतीक हालचाली, कळत-नकळत घटना,राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय, जिल्हास्तरीय, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत संपूर्ण  हालचाली किंवा माहिती 130 कोटी जनतेपर्यंत पोहचवीण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून होत असते.16 नोव्हेंबर 1966 ला प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाने राष्ट्रीय पत्रकारितेच्या निमित्ताने एक कार्यक्रम घेतला व यामध्ये ठरविण्यात आले की दरवर्षी 17 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय पत्रकारिता दिवस म्हणून साजरा करण्यात येईल.तेव्हापासुन प्रत्येक वर्षी 16 नोव्हेंबरला राष्ट्रीय पत्रकारिता दिवस म्हणून साजरा केल्या जातो.1920 मध्ये लेखक वाल्टर लिपमैन आणि एक अमेरिकी दर्शनिक जॉन डेवी यांनी लोकतान्त्रिक समाजामध्ये पत्रकारितेच्या भुमिकेवर विचार विमर्श प्रकाशित केले होते.पत्रकारिता,जनता आणि नितीनिर्माते यांच्यातील मध्यस्थीतीची भुमिका हाताळीत असते.तेव्हाच आपल्याला समतोलता दिसून येते.या समतोलतेचे दायीत्व पुर्णपणे पत्रकारितेवर अवलंबून असते व पत्रकार आपली जबाबदारी मोठ्या शिताफीने पारपाडतो.

प्रत्येक बाब जनतेच्या हितासाठी असावी या उद्देशाने प्रत्येक गोष्ट जनतेच्या हितार्थ प्रकाशित केल्या जाते.पत्रकारितेचे अनेक तत्व आहेत लिखाण, समाजातील घडामोडींवर नजर ठेवून माहीती एकत्र करने व ती पत्रकारितेच्या माध्यमातून समाजापर्यंत, सरकारपर्यंत व प्रशासनापर्यंत पोहचवणे. आजच्या आधुनिक युगात वर्तमानपत्र, रेडिओ, दूरदर्शन,वेब-पत्रकारिता, सोशल मिडिया यांच्या माध्यमातून पत्रकारितेची भुमिका मोठ्या प्रमाणात बजावली जाते. परंतु काही वाहिन्या स्वत:च्या स्वार्थासाठी कार्य करतात. यामुळे पत्रकारितेची बदनामी होतांना सुध्दा आपण उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे.

पत्रकारिता तीच असते ज्यामुळे समाजाची जडणघडण मजबूत होते व देशाचा पाया मजबूत होतो यालाच म्हणतात चौथास्तंभ .पत्रकारिता साधी शैली नसुन कोणत्याही घटनेचा लिखित रूपात वर्णन करण्याकरिता अनेक शैलींचा सटीकतेने उपयोग केल्या जातो यालाच म्हणतात “पत्रकारितेची शैली”. पत्रकारितेचे अनेक प्रकार आहेत एम्बुश पत्रकारिता, सेलिब्रिटी पत्रकारिता,कन्वर्जेस पत्रकारिता, गोंजो पत्रकारिता, खोजी पत्रकारिता, नवीन पत्रकारिता, विज्ञान पत्रकारिता, खेळ पत्रकारिता इत्यादी अनेक पत्रकारितेचे प्रकार आपल्याला पहायला मिळतात.पत्रकारांमध्ये नेहमी निष्पक्षता दिसून येते त्यामुळे समाजात खंबीरपणे उभे राहून आपल्या लेखणीच्या माध्यमातून धारधार लीखाण केले जाते.यातुनच समाजाला दिशा-निर्देश समजुन येतात.

पत्रकारितेच्या लेखणीत एवढी धार असते की तलवारीची धार त्यासामोर फीक्की पडतांना दिसून येते.कारण संपूर्ण समाजाच्या नैतकतेची जबाबदारी पत्रकारांच्या लेखणीतून निर्माण होत असते.आज पत्रकारितेच्या माध्यमातून स्थल,जल,वायु यातील घडामोडी जनतेला कळुन येतात.आज मिडियाच्या माध्यमातून व वृत्तपत्र समूहाच्या माध्यमातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी पहात असतो.या घडामोडी समाजापर्यंत पोहचविण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून होत असते.ज्याप्रमाणे सुरंग खोदुन खनीज संपत्ती शोधली जाते, त्याचप्रमाणे पत्रकारिता व लेखक आपले विचार समाजापर्यंत पोहचविण्याकरिता  प्रयत्न करीत असतो .म्हणजेच उन, पाऊस, थंडी, सुनामी,खडतडवाट यांचा विचार न करता माहिती गोळा करतो व समाजापर्यंत पोहचवितो.तेव्हा देशातील प्रत्येक व्यक्ती सकाळी वर्तमानपत्राची आतुरतेने वाट पाहत असतो.वर्तमानपत्राला सकाळचा नाश्ता सुध्दा म्हणतात.यावरून स्पष्ट होते की पत्रकारिता व लेखक यांच्यामुळे समाजाची जडणघडण होण्यास मोठी मदत मिळत असते.

आज पत्रकारिता कोहीनुरच्या हीऱ्यापेक्षाही जास्त मौल्यवान आहे.आज एका लेखणीतून लाखो-अरबो शब्द बाहेर पडतात म्हणजेच पत्रकारिता ही समुद्रापेक्षाही अफाट असल्याचे दिसून येते. यातुनच जगात मोलाचा संदेश जात असतो.लेखणीमध्ये व पत्रकारितेमध्ये एवढे ताळमेळ आहे की संपूर्ण जग लेखणीच्या माध्यमातून पत्रकारितेवर मोठ्या प्रमाणात विश्र्वास ठेवतो.मराठी भाषेतील आद्य पत्रकार बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी “दर्पण” नावाचे पहिले मराठी दैनिक सुरू केले होते.1832 साली सुरू करण्यात आलेले बाळशास्त्री जांभेकरांचे “दर्पण” हे मराठीतील पहिले वृत्तपत्र होय.यानंतर राजा राममोहन रॉय यांचा “संवाद कौमुदी”टिळक-आगरकरांचा ‘मराठा’ व ‘केसरी’ गणेश शंकर विद्यार्थी यांचा ‘प्रताप’ ही सर्व वृत्तपत्रे आर्थीक तोटा सहन करून समाज जागृत करण्यासाठी चालविलेल्या जात होती.परंतु आता देशात काही राजकीय पक्षांची वृत्तपत्रेसुध्दा दिसून येतात हि वृत्तपत्रे व वृतवाहिन्या पत्रकारितेला कलंकित करण्याचे काम करीत असतात. याला केंद्र व राज्य सरकारने कोठेतरी रोखले पाहिजे.

आपल्या पुर्वजांनी ज्याप्रमाणे पत्रकारितेची जोपासना केली त्याचप्रमाणे पत्रकारितेची जोपासना व्हायला पाहिजे आणि पत्रकारिता व चौथास्तंभ याला कोणताही आघात पोचनार नाही याची जबाबदारी राजकीय पुढाऱ्यांनी व सरकारने घेतली पाहिजे.टिआरपी वाढावी म्हणुन काही चॅनलनीं पत्रकारीतेची व चौथास्तंभ याची पायमल्ली करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो सरकारने उधळुन लावला. 16 नोव्हेंबर राष्ट्रीय पत्रकारिता दिवसांच्या निमित्ताने हेच सांगु इच्छितो की पत्रकारिता व चौथास्तंभ याला कुठल्याही प्रकारची क्षती होणार नाही याची काळजी सर्वांनीच घेण्याची गरज आहे.देशात कुठल्याही परिस्थितीत पत्रकारितेचे व्यवसायीकरण होवु नये व राजकीय दृष्ट्या कोसो दूर राहुन पत्रकारिता आणखी बळकट केली पाहिजे.कारण पत्रकारिता ही प्रसारमाध्यमांचे काम करीत असते यातुनच समाजाला दीशा निर्देश मिळत असते.पत्रकारिता ही वटवृक्षासारखी अफाट आहे कारण समाजातील घटना उन, पाउस, थंडी यासारख्या असतात यापासून संरक्षण करण्याचे काम पत्रकारिता नेहमी करीत असते.पत्रकार आपल्या जिवाची पर्वा न करता निर्भीडपणे कार्य करीत असतो.परंतु गेल्या काही वर्षांपासून असामाजिक तत्वांकडुन पत्रकारांवर हल्ले होत असतांनाचे दिसून येते याचा मी जाहीर निषेध करतो.अशा असामाजिक तत्वांना प्रशासनाने, केंद्र व राज्य सरकारांनी कोठेतरी रोखले पाहिजे व कठोर कारवाई केली पाहिजे.