देवगडचा हापूस वाशीतील कृषी उत्पन्न बाजारात दाखल, मात्र मोठी आवक मार्चपासूनच; सध्या पाच डझन आंब्यांना चार हजार रुपयांचा भाव
वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात देवगडचा हापूस आंबा दाखल होण्यास सुरुवात झाली असली, तरीही ओखी वादळामुळे यंदा हापूसचा हंगाम लांबणीवर पडणार असल्याचा अंदाज फळ व्यापारी व्यक्त करत आहेत. दरवर्षी साधारण फेब्रुवारीत सुरू होणारा हंगाम यंदा १५ मार्चपर्यंत लांबेल, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. १९ जानेवारीपासून देवगड हापूसच्या काही पेटय़ा बाजारात दाखल होऊ लागल्या आहेत. ५ ते ६ डझनाची एक पेटी साधारण ४ हजार ते ७ हजार रुपये बाजारभावाने विकली जात आहे.
शनिवारी हापूसच्या ५-७ पेटय़ा तर सोमवारी १५-२० पेटय़ा दाखल झाल्या. देवगडचा हापूस दाखल होण्यास सुरुवात झाली असली तरी खरा हंगाम हा १५ मार्चनंतरच सुरू होणार असल्याची माहिती घाऊक फळ व्यापाऱ्यांनी दिली. नोव्हेंबरमध्ये मोहोर येऊन फळधारणा सुरू असलेल्या हापूसला ओखी वादळ आणि लांबलेल्या पावसाचा फटका बसला. हापूस आंब्याला तीन वेळा मोहोर येतो. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये पहिला, डिसेंबर, जानेवारीत दुसरा तर फेब्रुवारीत तिसरा मोहोर येतो. नोव्हेंबर महिन्यात यंदा हवामान चांगले होते. त्यामुळे उत्तम फळधारणा होईल असे मत व्यक्त करण्यात येत होते, परंतु ओखी वादळ आणि पावसाच्या तडाख्याने थंडी कमी होऊन फळधारणा सुरू असलेल्या आंब्याचे नुकसान झाले. हेच नोव्हेंबरमध्ये फळधारणा झालेले हापूस आंबे जानेवारीअखेरीस व फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात बाजारात दाखल होतात, मात्र यंदा या सुरुवातीच्या पिकाचे नुकसान झाल्याने आवक उशिरा सुरू झाली असून उत्पादन आहे.