खरीप हंगामात पेरणीसाठी स्वतःकडे उपलब्ध असलेले सोयाबीन बियाणे उपयोगात आणा ; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन.

50

खरीप हंगामात पेरणीसाठी स्वतःकडे उपलब्ध असलेले सोयाबीन बियाणे उपयोगात आणा ; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन.

खरीप हंगामात पेरणीसाठी स्वतःकडे उपलब्ध असलेले सोयाबीन बियाणे उपयोगात आणा ; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन.
खरीप हंगामात पेरणीसाठी स्वतःकडे उपलब्ध असलेले सोयाबीन बियाणे उपयोगात आणा ; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन.

✒️मनोज खोब्रागडे✒️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर दि. 26 एप्रिल:- सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील २ वर्षापर्यंत वापरात येते.
त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःजवळ शिल्लक असलेले चांगले बियाणे पेरणीसाठी वापरावे. असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

शेतक-यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल.मागील दोन वर्षात शेतक-यांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाणापासुन उत्पादित झालेले सोयाबीन बियाणे शेतकरी चालु वर्षी पेरणीसाठी वापरु शकतात. तसेच ग्रामबिजोत्पादन, पीक प्रात्याक्षिके योजनेंतर्गत आलेल्या उत्पन्नातून बियाण्यांची निवड करता येते.

प्रमाणित बियाण्यांपासून आलेल्या उत्पादनातून चाळणी करून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची, बियाणे म्हणून निवड करावी. सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजुक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते त्यामुळे त्यांची उगवणक्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना काळजी घ्यावी. बियाण्याची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्कयांपेक्षा जास्त नसावे.
साठवणूकीसाठी प्लॅस्टिक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठवतांना त्याची थप्पी ७ फुटापेक्षा जास्त उंच असणार नाही याची काळजी घ्यावी. बियाणे हाताळतांना जास्त प्रमाणात आदळआपट होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रति हेक्टरी बियाणे दर ७५ किलोवरून ५० ते ५५ किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किंवा प्लँटरचा वापर करून पेरणी करावी.

सोयाबीनची उगवणक्षमता ७० टक्केपेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे. ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी.तसेच बियाण्याची पेरणी ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत करावी. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी.
रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी करावी.