मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई; आतापर्यंत ३८०५० व्यक्तिं विरुध्द कारवाई.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
नागपूर, ता.19:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी (१९ मे) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ९ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३८०५० नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,७३,८४,०००/- चा दंड वसूल केला आहे.
कोरोना विषाणूचा संसर्गाचा अदयापही धोका टळला नाही. आताही अनेक ठिकाणी नागरिक सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर विनामास्क नागरिक फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे तसेच त्यांना मास्क देण्यात येत आहे.
बुधवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे धरमपेठ झोन अंतर्गत १, नेहरुनगर झोन अंतर्गत २, आशीनगर झोन अंतर्गत ३ आणि मंगळवारी झोन अंतर्गत ३ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत ३२५८० बेजबाबदार नागरिकांकडून रु १ कोटी ६२ लक्ष ९० हजार वसूल करण्यात आले आहे.
नागपूरात रुग्णांची संख्यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करीत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. सुजाण व जबाबदार नागरिकांनी आता मास्क लावून आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा करावी, असेही आवाहन म.न.पा.तर्फे करण्यात आले आहे.