मुंबई महानगरपालिकेचे लसीकरणाचे जागतिक टेंडर रद्द, नऊ कंपन्या ठरल्या अपात्र.
✒मनोज कांबळे, नालासोपारा प्रतिनिधी✒
मुंबई.दि:4 जून :- मुंबई महानगरपालिकेने १२ मे ला शहरातील जनतेच्या लसीकरणासाठी 1 करोड कोवीड प्रतिबंधित लस खरेदी करण्यासाठी जागतिक टेंडर जाहीर केले होते. परंतु या टेंडरला प्रतिसाद देणाऱ्या 10 कंपन्या महानगरपालिकेच्या अहवाल आणि कागदपत्र तपासणीमध्ये अपात्र ठरल्याने मुंबईकरांचं लसीकरण लांबणीवर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे .
महानगरपालिकेच्या टेंडरला मे अखेरपर्यंत एकूण 9 जागतिक कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. त्यापैकी सात कंपन्या रशियाची स्पुतनिक व्ही, एक कंपनी स्पुतनिक लाईट (सिंगल डोस) आणि एक कंपनी जागतिक बाजारपेठेत जागतिक आरोग्य संघटनेमार्फत प्रमाणित असलेली कोणतीही लस महानगरपालिकेला पुरविण्यास तयार झाल्या होत्या. परंतु या कंपन्यांपैकी एकहि कंपनी लस उत्पादक नसून साऱ्या कंपन्या ह्या केवळ लस पुरवठादार असल्याने अश्या थर्ड पार्टी कंपन्यांची विश्वासहर्ता तपासण्याचे काम मुंबई महानगरपालिकने 1 जूननंतर चालू केले होते. या अंतर्गत लस पुरवठादार कंपनी आणि लस उत्पादक कंपनी यांच्यातील व्यावसायिक संबंध, कंपनीची लस वाहतूक आणि साठवणूक सुविधा, ठरल्या वेळेत संपूर्ण लसींचा पुरवठा करण्याची क्षमता, लसींच्या किमती आणि संबंधित परवाने या बाबींची छानबीन करण्यात आली. यादरम्यान टेंडरच्या नियमांची पूर्तता न केल्याने साऱ्या कंपन्या महानगरपालिकेतर्फे अपात्र ठरविण्यात आल्या. टेंडर रद्द झाले असले तरी मुंबईसाठी लस खरेदी करण्याची प्रक्रिया चालूच राहणार असून डॉ. रेड्डी यांच्याकडून जून अखेरपर्यंत स्पुतनिक-व्ही लसीचा पुरवठा करण्याबाबत चर्चा चालू असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
याअगोदर महाराष्ट्र सरकारने सुद्धा 5 करोड कोवीड प्रतिबंधित लस खरेदीच टेंडर लस उत्पादक कंपन्यानकडून प्रतिसाद न मिळाल्याने रद्द केले होते. टेंडरना प्रतिसाद देणाऱ्या बहुतेक पुरवठादार कंपन्या स्पुतनिक-व्ही लसीचा पुरवठा करण्यास तयार आहेत. परंतु भारतामध्ये स्पुतनिक-व्ही लसींच उत्पादन आणि विक्री करण्याचे हक्क फक्त डॉ.रेड्डी लॅब्स या एकाच कंपनीकडे आहेत. त्यामुळे स्पुतनिक-व्ही लसींचा पुरवठा करणाऱ्या इतर कंपन्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. रेड्डी लॅब्स कंपनीच्या प्रवक्त्यांकडून जाहीर करण्यात आली आहे. भारतातील राज्यांची गरज आणि भारतातील लस उत्पादक कंपन्यांची उत्पादन आणि वितरण क्षमता, लसींची आयात यामध्ये योग्य ताळमेळ साधण्यासाठी केंद्राला राष्ट्रीय लसीकरण पॉलिसी तयार करण्याची गरज असल्याची सूचना महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना दिली.