मीरा भाईंदरमध्ये विवाहित महिलेची गळा आवळून हत्या, उत्तर प्रदेशातून तिघांना अटक

✒नीलम खरात✒
मुंबईमहानगर प्रतिनिधी
मुंबई/भाईंदर,दि.6 ऑगस्ट:- काही दिवसा अगोदर मुंबईच्या उपनगर भाईंदरमधुन एक धक्कादायक बातमी समोर आली होती. भाईंदरमध्ये एका विवाहित महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली होती त्या प्रकारणी तीन आरोपींना उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. चोरीच्या उद्देशाने घरात घुसून गेल्या आठवड्यात महिलेची हत्या करण्यात आली होती.
मुंबईच्या उपनगर भाईंदर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या भोलानगर परिसरात राहणाऱ्या सुमनदेवी लाला शर्मा यांची राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने घरात घुसून गेल्या आठवड्यात त्यांची गळा आवळून हत्या केली होती. या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून कोणताही पुरावा नसताना तीन आरोपींना अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार लाला शर्मा आणि त्यांचा मेव्हणा हे भाईंदर पूर्वेला रबर कंपनीत नोकरी करतात. 21 जुलै रोजी सकाळी ते कामावर गेले होते, त्यावेळी घरी त्यांची पत्नी एकटीच होती. दुपारी सुमनदेवी शर्मा यांच्याशी पतीचे बोलणे झाले होते, मात्र कामावरून रात्री दहा वाजता ते परत आले असता भोला नगर चाळीतील पहिल्या मजल्यावरील घरातील लाईट बंद दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता सुमनदेवी अंथरुणावर पडलेल्या होत्या. त्यांनी पत्नीला उठवण्याचा प्रयत्न केला असता ती जागी झाली नाही.
सुमनदेवी यांच्या अंगावर घरातील साड्या अस्ताव्यस्त पडल्या होत्या. घरातील सामानही चोरीला गेल्याचे त्यांना दिसले. गळ्यातील मंगळसूत्र, कानातील कुडी आणि नाकातील नथ या दागिन्यांसह तीन मोबाईल हँडसेट, एटीमएम कार्ड आणि साऊंड बॉक्स चोरीला गेले होते. एकूण 35 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता.
दिवसा ढवळ्या झालेल्या या हत्येमुळे मुंबई पोलिसानवर आरोपीचा शोध घेण्याची मोठी जबाबदारी आली होती. मिरा भाईंदर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कुठलाही पुरावा नसतानाही निव्वळ तांत्रिक माहितीच्या आधारे उत्तर प्रदेश राज्यातील बलिया जिल्ह्यातून सोनू विजय चौहान वय 30 वर्ष, सुधीरकुमार तुलसी चौहान वय 19 वर्ष व मुन्नी कुलदीप चौहान वय 32 वर्ष यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता चोरीच्या उद्देशाने सुमनदेवींची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली. या खुनाच्या घटनेत कोणताही प्रत्यक्षदर्शी व्यक्ती किंवा पुरावा नसताना अतिशय कौशल्यपूर्ण तपास करत तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.