कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या 174 निकट नातेवाईकांना मदत
अर्ज भरतांना समस्या असल्यास 07184-251222 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करावा

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी/भंडारा : जिल्ह्यातील कोविडने मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या 174 नातेवाईकांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. शल्य चिकीत्सकांच्या अध्यक्षतेखालील समिती याबाबत कार्यरत आहे.
आयसीएमआरनुसार जिल्ह्यामध्ये 1142 लोकांचा मृत्यू हा कोविडमुळे झालेला आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीमध्ये सानुग्रह अनुदानासाठी आलेल्या अर्ज तपासण्यात येतो. आजपर्यंत कोविड सानुग्रह अर्थसहाय्यसाठी 1011 अर्ज मंजूर होऊन शासनाकडे पाठवण्यात आले. तर 301 अर्ज अपीलात असल्याचे व 25 अर्ज प्रलंबित असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांनी दिली.
पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती
कोविड-19 मुळे मृत व्यक्तीचे निकटचे नातेवाईक, अर्जदारांनी mahacovid19relief.in या संकेतस्थळावर लॉगिन करणे आवश्यक आहे. मृत व्यक्तीचे निकटचे नातेवाईक, अर्जदार त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचे आधार कार्ड,(पीडीएफ, जेपीजी स्वरूपात), मृत्यू प्रमाणपत्र (पीडीएफ, जेपीजी स्वरूपात) मृत व्यक्तीचे निकटचे नातेवाईक, अर्जदाराचा आधार संलग्न बँक खाते क्रमांक, अर्जदाराने खाते क्रमांक दिलेल्या बँक खात्याचा रद्द केलेला धनादेश (पीडीएफ, जेपीजी स्वरूपात) आणि रुग्णालयाचा तपशील, आरटीपीसीआर रिपोर्ट, सीटी स्कॅन रिपोर्ट किंवा ज्यावरुन त्या व्यक्तीस ‘कोविड 19’ चे निदान झाले, अशी कागदपत्रे (पीडीएफ, जेपीजी स्वरूपात) अपलोड करावे. या कागदपत्राच्या आधारे अर्जदाराला स्वतःचा मोबाईल क्रमांक वापरून साहाय्य मिळविण्यासाठी लॉगिन करता येईल.
अर्ज सादर करण्याबाबत व आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती mahacovid19relief.in या पोर्टलवर डॉक्युमेंट रिक्वायर्ड या टॅबवर उपलब्ध आहे. नागरिकांनी अर्ज करतेवेळी संबंधित कागदपत्रे व मोबाईल सोबत ठेवणे आवश्यक आहे. सदर मदत केंद्राचे कामकाज कार्यालयीन वेळेत सुरू राहील. अर्ज भरण्याबाबत काही समस्या असल्यास 07184-251222 या क्रमांकावर संपर्क करावा.
अर्जदाराने चुकीची माहिती देऊन अनुदान घेतल्यास अर्जदार फौजदारी कार्यवाहीसाठी पात्र असेल. एका मृत व्यक्तीसाठी एकाच जवळच्या नातेवाईकांना अर्ज करता येईल. अनेक नातेवाईकांनी केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून शासन निर्णयानुसार अंतिमतः मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्नित बॅंक खात्यात सानुग्रह साहाय्य निधी जमा करण्याची कार्यवाही करण्यात येईल.








