समाज प्रबोधनातुन व्यसनमुक्तीचा संदेश देवू – ना. मुनगंटीवार
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351
•सप्तखंजिरी वादक श्री. सत्यपाल महाराज यांचा कार्यक्रम संपन्न
चंद्रपूर : 24 ऑक्टोंबर
समाजाचा व विशेषतः भगिनींचा विचार करून व जिल्हयातुन आलेल्या मागणीनुसार चंद्रपूर जिल्हयात दारूबंदी लागू करण्याचा निर्णय मी घेतला होता, परंतु आता दारूबंदी उठली आहे. त्यामुळे समाजप्रबोधनातुन व्यसनमुक्तीचा संदेश देवून लोकांना व्यसनापासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय तसेच चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. दीपावलीच्या शुभपर्वावर परमपुज्यनीय शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेद्वारे आयोजित अनिल डोंगरे यांचे माध्यमातुन सत्यपाल महाराज यांचा समाजप्रबोधनपर किर्तन कार्यक्रम आयोजित केला होता. त्याप्रसंगी बोलताना ना. मुनगंटीवार यांनी प्रतिपादन केले.
जिल्हयात दारूबंदी केल्यानंतर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले होते. भगिनी व त्यांचे कुटूंबिय आनंदात होते, परंतु शासनाने काही कारणाने पुन्हा दारू सुरू केली व आज जागोजागी दारू दुकाने सुरू झाली आहेत. यापुढे शासकीय मदतीशिवाय ठिकठिकाणी समाजप्रबोधन करून व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगावे लागतील व समाजाला व्यसनापासून परावृत्त करावे लागेल याकरिता सत्यपाल महाराज यांचे समाजप्रबोधनपर किर्तन जिल्हयातील अनेक ठिकाणी आयोजित करावे लागतील. समाजाने व्यसनावर खर्च न करता तेच पैसे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरावे असेही प्रतिपादन ना. मुनगंटीवार यांनी यावेळी केले. अनिल डोंगरे व त्यांच्या चमूचे हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो.
याप्रसंगी बोलताना सत्यपाल महाराज यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांची प्रशंसा करताना जिल्हयात दारूबंदी करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. यापुढेही जिल्हयात सुधीरभाऊ सांगतील तिथे व तेव्हा व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमात समाजप्रबोधनासाठी मी उपलब्ध राहीन, अशी ग्वाही सत्यपाल महाराज यांनी यावेळी दिली. कार्यक्रमप्रसंगी प्रास्ताविक अनिल डोंगरे यांनी केले. कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहूले, शहर महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, डॉ. सुशिल मुंदडा, जिल्हा कृषी अधिकारी भूषण पराते, माजी उपमहापौर राहूल पावडे, पडोली ठाणेदार महेश कोंडावार, नरेंद्र जिवतोडे, अमित गुंडावार, लक्ष्मीकांत धानोरकर, दिगंबर वासेकर, अविनाश राऊत, भालचंद्र रोहनकर, पंडीत काळे, धनराज मुरकुटे, विक्की लाडसे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश क्षिरसागर, बाबुराव मुगोले, श्रीकृष्ण पिंपळकर, देविदास कौरासे, उत्तम लडके, सुर्यकांत डवरे, पंकज ठाकरे यांनी परिश्रम घेतले.