२६/११ ला शहिदांना श्रद्धांजली म्हणून व्हावे वृक्षारोपण     

रमेश लांजेवर

२६ नोव्हेंबर, नागपूर: 26 नोव्हेंबर 2008 मुंबईला हादरा देणारा दिवस ठरला व यांचे पडसाद भारतासह संपूर्ण जगात दिसून आले. आतंकवाद्यांच्या क्रृरतेमुळे ही भयावह घटना घडली.26/11 ची घटना जर आपण डोळ्यासमोर आणली तर अंगावर शहारे येतात एवढी भयावह घटना होती.त्यामुळे आजही वेदनादायी व कटु आठवणी मुंबईसह भारतीयांच्या मनात कायम आहेत.भारत स्वातंत्र्यानंतर देशात अनेक आतंकवादी हल्ले झालेत परंतु 26 नोव्हेंबर 2008 हा दिवस मुंबई सह भारतासाठी काळा दिवस ठरला व आज या घटनेला 14 वर्षे पूर्ण होत आहे.परंतु जखमा अजुनही ताज्या आहेत.कारण या भ्याड हल्यात 197 भारतीय,34 विदेशी नागरिकांचा मृत्यू झाला तर 800 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते त्याचप्रमाणे आतंकवाद्यांनी एकाच वेळी एकुण 12 ठिकाणी हल्ले केले होते.यामध्ये भारतीय जवानांनी 9 आतंकवाद्यांना कंठस्नान घातले व एकट्या कसाबला जिवंत पकडण्यात यश आले व यामुळेच पाकिस्तान कट्टर आतंकवादी समर्थक देश असल्याचे जगाला भारतानी दाखवुन दिले.यानंतर 21 नोव्हेंबर 2012 लाख कसाबला फाशी देण्यात आली.

या हल्ल्यात मुख्यत्वे करून भारतीयांसह अनेक विदेशी नागरिक सुध्दा होते त्यांचाही यात मृत्यू झाला.त्यामुळे या घटनेने संपूर्ण जग हादरले.26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानमधुन लष्करे तोयबाचे 10 आतंकवादी समुद्राच्या मार्गे  दक्षिण मुंबईत घुसले होते.पाकिस्तानी आतंकवाद्यांनी मुख्यत्वे करून विदेशी नागरिक असलेल्या हॉटेलला टार्गेट केले होते यात हॉटेल ताज, नरिमन हाऊस, होटेल ओबेरॉय, लिओपोल्ड कॅफे,सीएसएमटी,कामा रूग्णालय याशिवाय अनेक रेस्टॉरंटवर आतंकवाद्यांनी एकाच वेळी अंधाधुंद गोळीबार केला होता.अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणेला तब्बल तीन दिवस लागले.म्हणजेच जवळपास 60 तास दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरू होती.या दहशतवादी हल्ल्यात अनेक पोलिसांसह व वरिष्ठ अधिकारी शहिद झाले यात मुख्यत्वे करून हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे, संदीप उन्नीकृष्णन इत्यादींसह अनेक होते.10 दहशतवाद्यां पैकी एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आले हा दहशतवादी म्हणजे अजमल आमीर कसाब होय.शहिद तुकाराम ओंबळे यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता व आपल्या अंगावर अनेक गोळ्या झेलुन अजम कसाबला जिवंत पकडले.परंतु तुकाराम ओंबळे शहिद झाले.तुकाराम ओंबळे यांनी अजमल कसाबला जिवंत पकडल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा खरा चेहरा समोर येण्यास मदत झाली.यानंतर कसाबला 2010 मध्ये विषेश कोर्टाने दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली.यानंतर 21 नोव्हेंबर 2012 ला सकाळी साडेसात वाजता कसाबला पुण्यातील येरवडा कारागृहात फासावर लटकविण्यात आले व 26/11 च्या आतंकवादी कारवायांचा सरकारने शेवट केला.परंतु आजही 26/11 जखमा प्रत्येक मुंबईकरांच्या व भारतीयांच्या मनात व ह्रदयात कायम आहे.

26/11 च्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्ये आणि केंद्र सरकार सतर्क झाली व अशा पद्धतीच्या घटना पुन्हा उद्भवणार नाही याची काळजी घेवून देशाची संपुर्ण सुरक्षा यंत्रणां अत्याधुनिक पद्धतीने सज्य करण्यात आली आहे.त्यामुळे आता आतंकवाद्यांची घुसखोरी किंवा कोणत्याही कारवाईला मुतोड जवाब देण्यास भारतीय सुरक्षा यंत्रणां पुर्णपणे सज्ज आहे.त्यामुळेच आतंकवाद्यांच्या मुसक्या आवळण्यात यश येत आहे.याचे उदाहरण म्हणजे जम्मू काश्मीर मधील आतंकवाद्यांचा होत असलेला खात्मा.जोपर्यंत सुर्य-चंद्र आहे तोपर्यंत शहिदांना कोणीही विसरणार नाही.कारण त्यांच्या पुंण्यायीनेच आज आपण मोकळा श्वास घेत आहोत व सुरक्षित आहोत.

26/11 ला शहिदांना श्रद्धांजली अर्पण करतांना देशवासीयांनी लक्षात ठेवले पाहिजे की शहिदांची आठवण अनेक युगापर्यंत रहावी या करीता प्रत्येकांनी शहिदांच्या नावांनी एकतरी वृक्ष लावले पाहिजे.यामुळे शहिदांची आठवण दिर्घकाळ पर्यंत अवश्य राहीलच.त्याचप्रमाणे पर्यावरणाला या वृक्षाचा मोठा फायदा सुध्दा होईल.यामुळे गुरांना चारा, पशुपक्ष्यांना रहाण्यास घर व सर्वत्र शुध्द हवा मिळण्यास मोठी मदत होईल.हे सर्व शहिदांच्या नावांनी लावलेल्या वृक्षांनी सफल होवु शकते.यामुळे आपल्याला झाडाच्या पानांत, फुलात, फळात,जळा-मुळात आपल्या शहिदांचे दर्शन अवश्य होईल.त्यामुळे 26/11 चे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी व अनंत काळापर्यंत शहिदांची आठवण जागृत रहावी.हीच शहिदांना खरी श्रद्धांजली राहील असे मला वाटते.मातृभुमिची रक्षा करणाऱ्या देशाच्या शहिद शुरविरांना माझा कोटी-कोटी प्रणाम.जय हिंद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here